या गुन्ह्यात बोठेला अटक झाल्यानंतर त्याची चौकशी करून पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी सांगितले. बोठे याने सुपारी देऊन जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी हत्या घडवून आणली. या घटनेनंतर पोलिसांनी सागर उत्तम भिंगारदिवे, आदित्य सुधाकर चोळके, ऋषिकेश ऊर्फ टप्या वसंत पवार, ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे व फिरोज राजू शेख यांना अटक केली. हे पाच जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. घटनेनंतर नव्वद दिवसांच्या आता दोषारोपपत्र दाखल करणे बंधनकारक असते. त्यामुळे अटकेत असलेल्या पाच जणांविरोधात २८ फेब्रुवारीच्या आत दोषाराेपपत्र दाखल केले जाणार आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. केवळ बोठे याला अटक होणे बाकी आहे. बोठे मात्र गेल्या अडीच महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत आहे.
.................
बोठे सापडला नाही तर मालमत्तेवर टाच
बोठे सापडला नाही, तर पोलीस त्याला फरार घोषित करण्यासाठी व त्याची मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयात अर्ज करणार आहेत. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. बोठे याची नगर शहरासह जिल्ह्यातील मालमत्तेची पोलिसांनी माहिती घेतली आहे.