राहुरी : अहमदनगर जिल्ह्यात येत्या चार दिवसांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या राहुरी येथील हवामान शाखेचे प्रमुख डॉ. रवींद्र आंधळे यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आणखी चार दिवसांत वातावरण ढगाळ राहणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गहू, हरभरा, कांदा या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात मात्र, गारपिटीची शक्यता नसल्याचे रवींद्र आंधळे यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यात उत्तरेत संगमनेर आणि अकोला या तालुक्यांत तुरळक हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय दक्षिण नगर जिल्ह्यात श्रीगोंदा, पाथर्डी, शेवगाव, जामखेड या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आहे, असा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
....
अहमदनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता सोंगणी झालेल्या गव्हाच्या पेंढ्या झाकून ठेवाव्यात. धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे. गहू, हरभरा, कांदा या पिकाचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून काळजी घ्यावी.
- रवींद्र आंधळे,
हवामान विभागप्रमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी