अहमदनगर : पारधी समाजातील महिला सुमन काळे हिच्या मृत्यूप्रकरणी आरोपींविरोधात वाढीव खुनाचे कलम लावण्यासह काळे हिच्या नातेवाइकांना पाच लाखांची भरपाई द्या व हा खटला सहा महिन्यांत निकाली काढा, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच दिले.
चोरीचे सोने सराफांना विकते म्हणून पोलिसांनी सुमन काळे या पारधी समाजातील महिलेला १४ मे २००७ रोजी अटक केली होती. दरम्यान, अटकेनंतर तीन दिवसांनी तिचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांच्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केल्याने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे (सीआयडी) देण्यात आला. सीआयडीने तपास करून तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक देविदास सोनवणे, कोतवालीचे निरीक्षक तुकाराम वहिले, पोलीस कर्मचारी शिवाजी सुद्रिक, दीपक हराळ, सुनील चव्हाण, डाॅ. एस. एस. दीपक यांच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. पुढे २००८ मध्ये सुमन हिचा मुलगा साहेबा गजजान काळे (रा. बुरुडगाव रोड) यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आरोपींविरोधात खुनाचे कलम लावण्याची मागणी केली होती. सुमन हिने विष घेऊन आत्महत्या केली, असे पोलिसांचे म्हणणे होते, तर तिचा मृत्यू कोठडीत पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे झाला, असे काळे हिच्या कुटुंबीयांचे म्हणणे होते. पुढे व्हिसेरा अहवालात तिच्या शरीरात विष न आढळता जखमांमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, डाॅ. दीपक यांनी या गुन्ह्यातून आपल्याला वगळावे, अशी याचिका खंडपीठात दाखल केली होती; परंतु ती फेटाळण्यात आली.
याचिकाकर्ते काळे यांच्यातर्फे ॲड. राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले. आरोपींविरोधात वाढीव खुनाचे (३०२), खुनाचा पुरावा नष्ट करणे (२०१) व कट रचणे (१२० ब) अशी कलमे लावावीत. काळे हिच्या नातेवाइकांना पाच लाखांची भरपाई याचिकेच्या निकालानंतर ४५ दिवसांमध्ये द्यावी; तसेच हा खटला सहा महिन्यांत निकाली काढावा, असा आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती एम. जी. शेवलीकर यांनी १३ जानेवारीला दिला.