अण्णासाहेब वाकचौरे, ऑनलाइन लोकमत
अकोले ( अहमदनगर), दि. ७ - अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या पाण्याचे पूर्ण क्षमतेने आवर्तन सुरू असलेला उजवा कालवा अज्ञातांनी सोमवारी रात्री फोडला असल्याचे आढळून आले.
या उजव्या कालव्याची पाणी वहनक्षमता ६८ क्युसेक असून लाभक्षेत्रातील रब्बी हंगामातील पिकांसाठी पूर्ण क्षमतेने आवर्तन सुरू आहे.
वीरगाव येथील रोकडीनाथ मंदिराच्या मागच्या ओढ्यात रात्रभर सुमारे पंचवीस क्युसेक वेगाने पाण्याची नुकसान झाली. मात्र, या ओढ्यातील सर्व पाणी साठवण बंधारे पाण्याने तुडुंब भरल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्यांमध्ये समाधान आहे.
जलसंपदा विभागाचे कालवा निरीक्षक व कर्मचार्यांना या प्रकाराबाबत सकाळपर्यंत माहिती नव्हती. सकाळी उशीरापर्यंत थेट गावातून पाणी वाहत असूनही जलसंपदाच्या कर्मचाऱ्यांनी राजकीय दबावाखाली डोळेझाक केली आहे. याच ठिकाणी अनेकदा पाण्याची चोरी होत असल्याचा कालवा निरीक्षक व अधिकाऱ्यांनाही अनुभव आहे. स्थानिक नेते याकडे दुर्लक्ष करत आहेत.