अहमदनगर : नागरी भागातील दलित वसाहतींना अनेक समस्यांनी वेढले आहे़ या वसाहती समस्यामुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे़ मात्र नगरविकास खात्याने अवघ्या तीन कोटींवरच जिल्ह्याची बोळवण केली असून, या निधीचे नगरपालिकांना वाटप करायचे कसे, असा पेच जिल्हाप्रशासनासमोर आहे़ नगरविकास विभागाने चालू अर्थिक वर्षातील दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत निधी मंगळवारी वितरीत केला आहे़ नाशिक विभागातील धुळे, नाशिक शहर, जळगाव आणि धुळे जिल्ह्याला नगरविकास खात्याने झुकते माप दिले आहे़ तुलनेत नगर जिल्ह्यात अवघा ३ कोटी ३० लाखांचा निधी मिळाला आहे़ सर्वात कमी निधी नगर जिल्ह्याला मिळाला आहे़राज्यात क्षेत्रफळाने नगर जिल्हा सर्वात मोठा आहे़ नगर महापालिकेसह जिल्ह्यात नऊ नगरपालिका व पाच नगरपंचायतींचा समावेश आहे़ नागरी भागात राहणाऱ्या नागरिकांची संख्या ९ लाख इतकी आहे़ त्यापैकी एकट्या महानगरपालिका हद्दीत अनुसूचित जाती प्रवर्गाची संख्या ४५ हजार ८९५ इतकी आहे़ तर जिल्ह्यातील १४ पालिका हद्दीत ७४ हजार १७७ नागरिक या प्रवर्गातील आहेत़ असे असूनही दलित वस्ती सुधार योजनेेंतून जिल्ह्याला नेहमीच कमी निधी मिळतो, अशी या भागातील लोकप्रतिनिधीची तक्रार आहे़ त्यानुसार जिल्हाप्रशासनाने जास्तीच्या निधीची मागणी केली होती़ परंतु, या मागणीची नगरविकास खात्याने दखल घेतली नाही़ प्राप्त ३ कोटी ३० लाखातून एकट्या महानगरपालिकेला १ कोटी १० लाख दिले जाणार आहेत़ उर्वरित २ कोटी २० लाख १४ नगरपालिकांना वितरीत होणार आहे, याचा अर्थ नगरपालिकांच्या वाट्याला अत्यल्प निधी येणार आहे़ कामांच्या किमती कमालीच्या वाढलेल्या आहेत़ छोटा रस्ता तयार करायचा झाला तरी, त्यासाठी लाखो रुपये लागतात़ मग या निधीतून मोठी कामे होणार कशी असा प्रश्न आहे़ काहीभागात अनेक समस्या आहेत़ दलित वस्तीतून फेरफटका मारल्यास ते दिसूनही येते़ मात्र त्यासाठी आवश्यक असणारा निधी मात्र सरकारकडून मिळत नाही़ परिणामी दलित वसाहतींतील प्रश्न वर्षानुवर्षे जैसे थे आहेत़(प्रतिनिधी)
दलित वसाहतींची नगरविकासकडून बोळवण
By admin | Updated: July 5, 2016 23:56 IST