ब्राह्मणी : ब्राह्मणी व इतर चार गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावात बदल करण्यात आला असून यामध्ये आणखी दोन गावांचा समावेश केला आहे. त्यामुळे आता ही योजना सात गावांसाठी होणार आहे. या योजनेतून प्रतिदिन दरडोई ४० लिटरऐवजी ५५ लिटर पाणीपुरवठा केला जाईल. योजनेला तांत्रिक मान्यता मिळण्याची प्रतीक्षा आहे, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता मोहन सराफ यांनी सांगितले.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ब्राह्मणी व इतर चार गावे प्रादेशिक पाणी योजनेस २४ जून २०१९ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाली होती; परंतु आचारसंहिता लागू झाल्याने कामाची निविदा प्रक्रिया राबविता आली नाही. योजनेची आखणी दरडोई ४० लिटरप्रमाणे करण्यात आली होती. दरम्यान, राज्यात नोव्हेंबर २०१९ अखेर जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत योजनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३० जानेवारी २०२० च्या परिपत्रकानुसार ५५ लिटर दरडोई निकषाप्रमाणे पाणी पुरवठ्याचे निकष करून फेर मान्यता घेण्याविषयी सूचना प्राप्त झाल्या. योजनेत ब्राह्मणी, उंबरे, पिंप्री अवघड, सडे, कुक्कडवेढे या गावांचा समावेश होता. फेर प्रस्तावात या योजनेत चेडगाव व मोकळ ओहळ या दोन गावांचा समावेश करण्यात आला. हा सुधारित प्रकल्प अहवाल जीवन प्राधिकरणाच्या नगर कार्यालयातून मुख्य अभियंता, नाशिक यांच्या कार्यालयात मंजुरीसाठी सादर केला आहे. नवीन योजनेसाठी ६० कोटी ५७ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, असेही सराफ यांनी सांगितले.
............
ब्राह्मणी व इतर चार गावे योजनेच्या जुन्या आराखड्यात मुळा धरणातून दहा किलोमीटरची मुख्य जलवाहिनी एसडीपी प्रकारची होती. ती वारंवार फुटण्याचा धोका होता. नवीन योजनेत मुख्य जलवाहिनी लोखंडी (जीआय) केली जाणार आहे. ४० ऐवजी ५५ लिटर दरडोई पाणी मिळणार आहे. जुनी तकलादू योजना बदलून, नवीन योजनेत आणखी दोन गावांचा समावेश केला आहे.
- डॉ. राजेंद्र बानकर, माजी उपसरपंच, ब्राह्मणी