कोपरगाव : नांदूर मधमेश्वर धरणातून प्रचंड वेगाने पाणी सोडण्यात आल्याने मंगळवारी दुपारी गोदावरीचा डावा व उजवा हे दोन्ही कालवे फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. जलसंपदा विभागाकडून युद्ध पातळीवर कालवे दुरूस्ती करण्यात येत आहे.नाशिक परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. हे पाणी नांदूर मधमेश्वर धरणात आल्यावर सोमवारी गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना सोडण्यात आले. सुमारे चौदा हजार क्युसेक वेगाने पाणी प्रवाहीत झाल्याने कालवे तुडूंब भरून वाहत आहेत. दरम्यान, पाण्याचा दाब सहन न झाल्याने शंभर वर्ष पूर्ण झालेला डावा कालवा मुंगेर लागून मंगळवारी दुपारी ब्राम्हणगाव, तर उजवा कालवा विंगणवाडीनजीक अचानक फुटला. दोन्ही कालवे फुटल्याने लाखो लीटर पाणी परिसरातील शेतामध्ये घुसले. घटनेची माहिती मिळताच नाशिक जलसंपदा विभागाचे कायर्कारी अभियंता राजेंद्र शिंदे यांनी भेट दिली. संजीवनी उद्योग समूहाचे नितीन कोल्हे यांनी पोकलॅन व जेसीबी उपलब्ध करून दिले. उपअभियंता कासम गोतूवार व भास्कर शिरळे यांच्या अधिपत्याखाली कालवे दुरूस्तीचे काम युद्ध पातळीवर चालू झाले आहे. संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजी वक्ते घटनास्थळी भेट देवून मदत केली.कालवे फुटल्याने पाण्याचा अपव्यय होवू नये म्हणून दारणा धरणाचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. संबंधीत कालव्यांच्या दुरूस्ती साठी जलसंपदा मंत्री यांना भेटणार असल्याचे आमदार स्नेहलता कोल्हे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी )गोदावरी कालव्यांवर लाभक्षेत्रातील अनेक गावांचे भवितव्य अवलंबून आहे. ब्रिटीशकालीन मातीच्या कालव्यांना शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. यापूर्वीही तीन वेळा कालवे फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. तिन्ही वेळा कोट्यवधी रुपये खर्च करून कालव्यांची दुरूस्ती केली गेली आहे. नुकतीच ५५ कोटी रूपयांच्या दुरूस्ती मंजुरी मिळाल्याचे समजते.४उजव्या कालव्याचे पाणी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. तर डाव्या कालव्याची पाणी चालू ठेवून दुरूस्ती करण्यात येत असल्याचे शाखा अभियंता सुराळे यांनी सांगितले.
गोदावरीचे दोन्ही कालवे फुटले
By admin | Updated: July 13, 2016 00:28 IST