अकोले : देशातील शेती, शिक्षण, आरोग्य याचे कंपनीकरण करण्याचा भाजपाचा घाट असून शेतकरी उद्ध्वस्त करून उद्योगपतींच्या हातात देश सोपविण्याचा घाट केंद्र सरकारने आखला आहे, अशी टीका मधुकर नवले यांनी केली.
काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर अकोले येथील अभिनव शिक्षण संकुल येथे पत्रकार परिषद घेऊन मधुकर नवले, मीनानाथ पांडे, रमेश जगताप, मदन पथवे, विक्रम नवले यांनी आपली भूमिका मांडली. नवले म्हणाले, पुरोगामी डाव्या विचारसरणीच्या मुशीत राजकीय पिंड पोसला गेल्याने भाजपचे विचार कधीच मनाला शिवले नाहीत, पण केवळ पिचड यांच्या व्यक्तिगत प्रेमापोटी आपण विधानसभा निवडणुकीत भाजपच्या व्यासपीठावर होतो. काँग्रेस विचारांशी पूर्वीच नाळ जोडली असून तालुक्यातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी आपण पक्ष बदल केला आहे. स्वगृही परतल्याचे समाधान वाटते. महाआघाडीचा धर्म पाळून भविष्यातील निवडणुकांना सामोरे जाऊ, असे नवले म्हणाले.
...........
राष्ट्रवादीत सन्मान मिळाला नाही - पांडे
राष्ट्रवादीत चाळीस वर्षांत कार्यकर्त्यांना सन्मान, प्रतिष्ठा मिळाली नाही. राष्ट्रवादीच्या नव्या नेतृत्वाने ती परंपरा पुढे कायम ठेवली. राष्ट्रवादीत सन्मान मिळत नसल्याने आपण पक्ष सोडला, अशी खंत मीनानाथ पांडे, मदन पथवे यांनी व्यक्त केली. निळवंडेचे भूमिगत बंद पाईप कालवे ही मागणी चुकीचीच होती, असा टोला लगावत ३२ गाव पाणीपुरवठा योजना, तालुक्यातील रस्ते, क्रीडासंकुल, नदीपात्रातील प्रोफाइल वॉल, निळवंडे कालवेग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामार्फत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.