अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी अंतर्गत झालेल्या कुरघोड्या, जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीत ऐनवेळी झालेले राजकारण याचा समाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास ‘शेलक्या’ शब्दांत घेतला. जनमत आणि स्वच्छ प्रतिमा असणाऱ्यांना पक्ष संघटनेत स्थान द्या, पराभवाने खचून जाऊ नका, लावालावी करणाऱ्या जित्राबांपासून सावध राहा, भानगडी करणाऱ्यांना पक्षापासून लांब ठेवा, असे सूचनावजा आदेश देत पवारांनी स्वपक्षीय नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. ‘१८ ते २५ वयोगटातील तरूणांना जपा, जनरेशन गॅप वाढू देऊ नका, स्वभावात बदल करा’ असा खास मंत्र त्यांनी आगामी निवडणुकीच्या निमित्ताने दिला. शहरात शुक्रवारी राष्ट्रवादीचा बहुचर्चित निर्धार मेळावा झाला. ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री मधुकर पिचड, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, आ. शंकरराव गडाख, बबनराव पाचपुते, अरूण जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, अशोक सावंत, शिवाजी गर्जे, महापौर संग्राम जगताप, महिला जिल्हाध्यक्षा मेधा कांबळे, बिपिन कोल्हे, जिल्हा परिषद सदस्य, महापालिकेचे नगरसेवक उपस्थित होते.लोकसभेतील पराभव आणि जिल्हाध्यक्ष निवडणुकीत काही नेत्यांनी केलेल्या राजकारणाचा धागा पकडून पवार आज फटकारतील, हा अंदाज खरा ठरला. प्रारंभापासूनच पवार आक्रमक होते. पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागलेला नाही. यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागवे. पक्ष संघटनेत पदाधिकारी निवडतांना स्वच्छ प्रतिमा असणाऱ्यांना स्थान द्या, ज्याचे घर दुसऱ्या पक्षाचे काम करत असेल त्यांनी आधी आपले घर सांभाळावे, असा सल्ला त्यांनी दिला. नवे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना सल्ला देताना, काशिनाथ दाते यांची जिल्हाध्यक्षपदी झालेली निवड घोषणा करून बदलण्यात आली. प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेवरून त्याची निवड झाली होती. ऐनवेळी निवड बदलल्याने कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नगर जिल्ह्यातील काही गोष्टी समजून घ्या. या ठिकाणी लावालावी करणारी जित्राबं असून त्यांच्या पासून लांब राहा. पक्षात निर्णय घेतांना कोणी नाराज होत असले, तर त्यांना काय वाटेल याचा विचार करू नका. आम्ही एस काँग्रेस, समांतर काँग्रेसपासून पवारांसोबत आहोत असे कोणी म्हणत असेल तर म्हणू द्या, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)‘जिल्हाध्यक्षांची निवड समन्वयातूनच’अहमदनगर: राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची निवड करताना एका रात्रीतून झालेल्या नावबदलासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेळाव्यात पक्षातील नेत्यांवर टिका केल्यानंतर पत्रकरांशी बोलताना मात्र ‘जिल्हाध्यक्षांची निवड समन्वयातून झाल्याचे’ सांगत सावरासावर केली. घनशाम शेलार यांनी पक्ष सोडताना राष्ट्रवादीला स्वाभिमानाचा विसर पडल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, पक्ष सोडण्यासाठी प्रत्येकाला काहीतरी कारण द्यावं लागतं. त्यामुळे त्यांनी अशी टीका केली असेल. पक्षात सगळे मिळून चर्चा करून मगच निर्णय घेतात. शेलार यांचे ते वैयक्तिक मत असू शकेल. कुटुंबातही वेगवेगळे मतप्रवाह असतात. पण कुटुंब प्रमुखाचा निर्णय अंतिम असतो. दाते यांचे जिल्हाध्यक्षपदासाठी निश्चित असताना रात्रीतून बदल करण्याची नामुष्की पक्षावर ओढावली काय? असे विचारले असता, ते म्हणाले, दोघेही चांगले सहकारी आहेत. दोघांच्याही मनाचा मोठेपणा आहे. समन्वयातून निवड करा असे प्रदेशाध्यक्षांना सांगितले होते. पण यापुढे असे होता कामा नये, अशी सूचना त्यांनी सोबत असलेले प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना तेथेच दिली. (प्रतिनिधी)दुष्काळाची खबरदारी घ्या...राज्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचे संकट येऊ शकते. हे जाणूनच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्र शरद पवारांकडे आदराने पाहतो. पवार यांनी मोदी यांना संकट येण्यापूर्वीच खबरदारी घ्यावी असे सांगितले. अनुभव संपन्न कोणी नसतो. अनुभवातून प्रत्येकजण शिकतो. केंद्रीय मंत्री असताना केलेल्या उपाययोजनांची माहिती पवार यांनी मोदी यांना दिल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. कांदा निर्यात शुल्क वाढविल्याने कांद्याची निर्यात कमी होणार आहे. त्यामुळे कांद्याचे भाव फार वाढणार नाहीत. शेतीमालाचे भाव पडतात त्यावेळी शेतकऱ्यांना कोणी वाली नसतो. भाववाढीवरून शरद पवारांना सगळेच टार्गेट करायचे. आता तर ते केंद्रात मंत्री नाहीत. त्यामुळे कोण कसा आहे, हे जनतेने पहावे असे पवार यांनी सांगितले. मेळाव्यात उपस्थित कार्यकर्ते कोणकोणत्या तालुक्यातून आलेले आहेत, हे पाहण्यासाठी तालुकानिहाय त्यांना हात वर करण्यास सांगण्यात आले. बहुतांशी तालुक्यातून मोजके कार्यकर्ते आलेले होते. राहाता तालुक्यातील एकाने तर निरोप नसतांना आलो आहे, असे सांगितले. त्यावर ‘तुमच्यामुळेच पक्ष उभा आहे’ असे पवार यांनी सांगितले. विधानसभेत चुका करु नका जिल्हा परिषदेत मिळालेली पदे ही पक्ष संघटनेमुळे मिळालेली आहेत. याचा विसर पदाधिकाऱ्यांनी पडू देऊ नये. राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला असून त्यातून झालेल्या विकास कामांचा प्रचार करा, लोकसभा निवडणुकीत केलेल्या चुका विधानसभेत करु नका. कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवा, त्याचे मतात परिवर्तन करा, ‘अमुकतमुक गेला उडत’ ही भूमिका सोडून द्या, असे सुचवतानाच चांगली टीम बांधा, असा सल्ला त्यांनी जिल्हाध्यक्ष अभंग यांना दिला.अच्छे दिनच्या नावाने वेगळ्याच दिशेने!तीस वर्षानंतर एका व्यक्ती भोवती देशाचे राजकारण फिरविले आहे. १९९४ ते २०१४ या काळात सामुदायिक नेतृत्वाखाली निवडणुका लढविल्या गेल्या. मोदी सरकार ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेला वेगळ्या दिशेने नेत आहेत. केंद्र सरकारने विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेल्या भाव वाढीला तीन महिने स्थगिती दिली आहे. भाव यांनीच वाढवायचे, आंदोलन यांनी करायचे आणि भाव कमी केल्याचे अभिनंदनाचे फलक यांनीच लावायचे, अशा प्रकारे दिशाभूल करण्याचा उद्योग सुरू केल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी भाजपाचे नाव न घेता केला.महागाईचे आव्हान स्वीकारा!जयंत पाटील यावेळी म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर दोन महिन्यांपूर्वी जे प्रश्न होते ते आजही आहेत. यामुळे मोदी सरकारने जनतेला त्रास न देता महागाई कमी करण्याचे आव्हान स्वीकारावे. भाजपा हा शेतकऱ्यांच्या नव्हे, तर शहरातील मूठभर लोकांचा पक्ष असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी अॅड.पाटील, पालकमंत्री पिचड, महापौर जगताप, पाचपुते, काकडे, अभंंग, कांबळे यांची भाषणे झाली. लोकसभा निवडणुकीपासून पराभूत उमेदवार राजीव राजळे पक्षाच्या कार्यात सक्रिय झालेले नाहीत. याची दखल उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतली. मोनिका राजळे जोमाने कामाला लागल्या आहेत. यामुळे राजीव यांनी आता बाहेर पडावे, असे ते म्हणाले. हाच विचार भाऊसाहेब वाकचौरे करत असतील, त्यांचे किती नुकसान झाले, याचा विचार करा, असे ते म्हणाले.महिला पदाधिकाऱ्यांना पुढील ९० दिवस पक्ष प्रचारासाठी वाहन उपलब्ध करून देण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या. महिलांनी तालुक्यात प्रचार करावा, वाहनाचा वापर पक्ष कार्यासाठी करावा. महिला पंढरपूरला आणि पुरूष कार्यकर्ते ढाब्यावर, असे होऊ देऊ नका अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
लावालावी करणाऱ्या जित्राबांपासून सावध राहा
By admin | Updated: July 5, 2014 00:33 IST