तालुक्याच्या राजकारणावर या ग्रामपंचायतींचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच प्रमुख नेते येथील निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या भाग घेतात. येथे १७ जागांसाठी निवडणूक होत असून, चौदा हजारांहून अधिक मतदार गावचे कारभारी ठरविणार आहेत. शरद नवले, बाजार समिती संचालक सुधीर नवले, पंचायत समिती सदस्य अरुण नाईक, अशोकचे संचालक अभिषेक खंडागळे, जनता आघाडीचे रवींद्र खटोट, भरत साळुंके, भाजपचे सुनील मुथ्था, प्रफुल्ल डावरे ही नेते मंडळी बैठकांमध्ये व्यस्त आहेत.
माजी आमदार भानुदास मुरकुटे गट विरुद्ध काँग्रेस अशीच येथे नेहमी लढत राहिली आहे. मात्र, जनता आघाडी आणि भाजपने भूमिका जाहीर केलेली नाही. ग्रामपंचायतीत काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालेली जनता आघाडी निवडणूकपूर्व युतीपासून लांब आहे. शरद नवले हे मुरकुटे गटासोबत जातील अशी स्थिती असली तरी त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही.
साई ग्रामविकास मंडळ नव्याने उदयास आले आहे. या मंडळाने सर्व जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. कैलास चायल यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन विद्यमान सत्ताधारी आणि विरोधक यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करून वेगळा पर्याय देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रत्येक गटाला व्यूहनीती आखताना अडचणी येत आहेत.