आॅनलाइन लोकमतराहाता (अहमदनगर) दि़१९- शेतकऱ्यांना कर्ज माफी करावी, इव्हीएम मशीन बंद करा यासारख्या विविध मागण्यांसाठी बुधवारी राहाता येथे बहुजन क्रांती आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालय घोषणांनी दणाणून सोडले. शेतकऱ्यांना कर्ज माफी करा , शेतमाल व दुधास हमी भाव द्या, निळवंडे कालव्याची कामे त्वरित करा,ईव्हीएम मशिन बंद करुन निवडणूक मतपत्रिकेवर घ्यावी यासारख्या तीस मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन केल्यानंतर राहाता शहरातून घोषणा देत तहसील कार्यालयात मोर्चा दाखल झाला. मोर्चेकऱ्यांनी तहसील परिसर घोषणा देत दणाणून सोडला. यावेळी मोर्चाला मार्गदर्शन करताना मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. अनिल माने म्हणाले की, आमच्या मागण्या संविधानिक आहेत. आमच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सरकारकडे मोर्चाव्दारे आक्रोेश करीत आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत सरकार विरोधात आमचा लढा सुरु राहील. गरज पडल्यास मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे केले जाईल. भारतीय विद्यार्थी सेनेच्या विद्यार्थिनींनी निवेदन व संविधान प्रास्तविके चे वाचन केल्यानंतर प्रियंका म्हस्के, सुप्रिया मंतोडे ,नंदिनी मंतोडे यांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले. यावेळी शांताराम उपाध्ये, सोमनाथ दरंदले, सुनील बोऱ्हाडे, राजेंद्र बर्डे, दत्ता गोरे, अनिल सोमवंशी, विनायक निकाळे, निलेश दुरगुडे, सचिव बनसोडे, संतोष रोहम, अनिल मंतोडे यांची भाषणे झाली.
राहात्यात बहुजन आक्रोश मोर्चा
By admin | Updated: April 19, 2017 19:47 IST