नेवासा : नेवासा तालुक्यातील अकराशे रोहित्रांना मंजुरी मिळाली असून बारा तास शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार शंकरराव गडाख यांनी दिली.तालुक्यातील शिरसगाव, गळनिंब येथील रोहित्राच्या शुभांरभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे होते. गडाख म्हणाले, पाच वर्षापूर्वी वीजप्रश्न गंभीर होता. जायकवाडी बॅकवॉटरवर शेतकऱ्यांची मोठी प्रमाणावर रोहित्रांची मागणी होती. बॅकवॉटर वरील शेतकऱ्यांना उचलून पाणी घ्यावे लागते. इन्फ्रा-१ या योजनेत जास्तीत जास्त रोहित्र बॅकवॉटर परिसरात शेतकऱ्यांसाठी बसविलेले आहे. बारा तास पूर्ण दाबाने वीज मिळण्यासाठी माझी संघर्षाची तयारी आहे. नगर ग्रामीण व्हिजनसाठी नेवासा तालुक्यातील ८० कोटींचा निधी सरकारकडे पाठपुरवठा करून मिळविला आहे. तालुक्यातील जुने रोहित्र बदलणे, उपकेंद्रात बदल व इतर कामे इन्फ्रा-२ या योजनेतून हाती घेण्यात आली आहेत. या योजनेत अकराशे रोहित्रे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे तालुक्यात किमान पुढील पाच वर्षापर्यत वीज प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, असे गडाख म्हणाले.यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी हजर होते. अकराशे रोहित्रांना मंजुरी मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)शेती,पाणी व वीजमी स्वत. शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या व्यथा मला माहिती आहेत. त्यामुळे वीज व पाणी या प्रश्नांसाठी नेहमी शेतकऱ्यांबरोबर राहून प्रश्न सोडविण्यावर भर रहाणार आहे, असे आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले.
नेवाशात अकराशे रोहित्रांना मंजुरी
By admin | Updated: June 16, 2014 00:09 IST