अहमदनगर : शेतकऱ्यांना स्वत:चा पेरा स्वत:च्या मोबाईलमधून भरता यावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ८५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र प्रत्यक्ष माहिती भरताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा, या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना स्वत:चा पेरा स्वत:च्या मोबाईलमधून भरता यावा, यासाठी राज्य शासनाने १५ ऑगस्ट २०२१ पासून ई-पीक पाहणी प्रकल्प सुरू केला आहे.
त्यानुसार नगर जिल्ह्यात तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांनी यासाठी नियाेजन केले आहे. याच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभागही मदत करत आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ८५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये प्रत्यक्ष वापरात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना मोबाईल वापराचेही पुरेसे ज्ञान नसल्याने त्याही अडचणी आहेत. प्रत्यक्ष किती शेतकऱ्यांनी ॲपवर पीक पेऱ्याची माहिती भरली, याचा तपशील मात्र महसूल विभागाकडून उपलब्ध होऊ शकला नाही.
----
तालुकानिहाय ॲप डाऊनलोड केलेले शेतकरी
तालुका शेतकरी संख्या
अकोले ४८९५
नगर ५८३७
कर्जत ६६९६
कोपरगाव ५४६१
जामखेड ५५१९
नेवासा ६३२८
पाथर्डी ७३१८
पारनेर ३४७२
राहाता ५५१३
राहुरी ४३८१
शेवगाव १९७१
श्रीगोंदा ५५५४
श्रीरामपूर ४८७४
संगमनेर १७९७
-------
ई-पीक पाहणीसाठी तलाठी प्रत्यक्ष शेतात येऊन मार्गदर्शन करतात. त्यामुळे शेतकरी वर्गाला चांगली मदत होते. माझी शेती वडिलांच्या नावावर आहे. वडील अशिक्षित असल्याने स्वत: पीक पाहणीची नोंद केली.
-संतोष सोनवणे,
शेतकरी, आढळगाव