लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट झाल्याशिवाय २०२०-२१ ची संचमान्यता मिळणार नसून जिल्ह्यात अद्याप १८ टक्के विद्यार्थ्यांचे आधार अपडेशन बाकी आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांमुळे संबंधित शाळांची संचमान्यता अडकली आहे. दरम्यान, आतापर्यंत ८२ टक्के विद्यार्थ्यांचे आधार अपडेट झाले आहे.
पुढील शैक्षणिक वर्षांत शिक्षक संचमान्यता देताना केवळ आधारकार्ड नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे आधारकार्ड नसेल तर तो विद्यार्थी शिक्षकांच्या संचमान्यतेसाठी उपयोगी ठरणार नाही. त्यातून शिक्षक पदे अतिरिक्त ठरण्याचा धोका आहे. यासंदर्भात शाळांनी विद्यार्थ्यांचे आधारकार्ड विद्यार्थी पोर्टलवर तात्काळ अपडेट करण्याचे आदेश मे महिन्यातच शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून शाळेची शिक्षक संचमान्यता ऑनलाईन् स्वरूपात होत आहे. त्यासाठी आतापर्यंत शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर दिली जात होती. परंतु, आता प्रत्येक विद्यार्थ्याचे आधारकार्ड संचमान्यतेसाठी गृहीत धरले जाणार असल्याने शिक्षकांच्या, पर्यायी शाळांच्या अडचणी वाढल्या आहेत.
-------------
आधारकार्ड काढण्यासाठी शिक्षकांचीच पायपीट
विद्यार्थ्यांचे आधारकार्ड शिक्षकांच्या संचमान्यतेसाठी महत्त्वपूर्ण ठरल्याने अनेक शिक्षक वारंवार पालकांना आधारकार्ड काढण्याचे आवाहन करतात. मात्र, अनेक पालक ही बाब गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे पर्यायाने शिक्षकांनाच विद्यार्थ्यांना घेऊन आधारकार्ड काढण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे अनेक शिक्षक मुलांचे आधारकार्ड काढण्यासाठी आधार केंद्रावर दिसत आहेत.
---------------
जिल्ह्यातील शाळा (पहिली ते बारावी) -
विद्यार्थी - ९ लाख १४ हजार ७७६
आधार अपडेट झाले - ८२ टक्के
----------
पहिलीच्या अनेक विद्यार्थ्यांची रेशनकार्डमध्ये नावे नसतात. आधार केंद्र शहराच्या ठिकाणी असल्याने पालक विद्यार्थ्यांना गर्दीच्या ठिकाणी पाठवत नाहीत. अनेकांच्या आधारकार्ड व शाळेतील नावामध्ये तफावत आहे. अशा अनेक अडचणी आधारकार्ड अपडेशनमध्ये येत आहेत.
- किशोर जगताप, मुख्याध्यापक, धनगरवाडी, ता. राहाता
-------------
संचमान्यतेसाठी आधारकार्ड आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात ८२ टक्के काम झालेले आहे. उर्वरित आधारकार्ड अपडेशनचे कामही लवकरच होईल.
- शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक