लोकसंस्कृती जपणाऱ्या मरिआईवाल्यांचे जीवन उपेक्षितच
By Admin | Updated: January 23, 2017 02:31 IST2017-01-23T02:31:08+5:302017-01-23T02:31:08+5:30
अगदी पूर्वापर चालत आलेल्या चालीरीती, रूढी, परंपरा जोपासणारे आपले संस्कृतीपूजक राज्य महाराष्ट्र. गावात व गावगाड्यात

लोकसंस्कृती जपणाऱ्या मरिआईवाल्यांचे जीवन उपेक्षितच
गोलेगाव : अगदी पूर्वापर चालत आलेल्या चालीरीती, रूढी, परंपरा जोपासणारे आपले संस्कृतीपूजक राज्य महाराष्ट्र. गावात व गावगाड्यात ज्याप्रमाणे बारा बलुतेदारांना महत्त्व होते, तसेच महत्त्व मरिआईवाले, नंदीवाले, वासुदेव, पिंगळा, बहुरूपी आदींना होते.
भटके जीवन जगणाऱ्या या लोकांचे आजही हलाखीचे व उपेक्षितच जगणे चालू असल्याची वेदना मरिआईवाले सुखदेव रंगप्पा देवकर व त्यांच्या पत्नी शांताबाई यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असणाऱ्या पिनौर या छोट्याशा खेडेगावातून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी हे कुटुंब शेकडो किलोमीटर भटकंती करत आहे. मरिआईचा देव्हारा डोक्यावर घेऊन आलेली महिला व हातातील आसुडाने उघड्या अंगावर फटके मारणारा देवीचा भक्त व त्या आसुडाच्या कडकड आवाजाने भेदून निघणारे आसमंत यामुळे काही काळ सर्वत्र अभेद्य अशी शांतता पसरते. मरिआईवाली महिला आपल्याजवळील ढोलातून गुबुगुबु आवाज काढून देवीच्या दर्शनासाठी येण्याचे आमंत्रण देत असते.(वार्ताहर)
४मरिआईची मनोभावे पूजा केल्याने घरातील व गावातील संकट, रोगराई, इडापिडा नष्ट होत असल्याची भावना लोकांमध्ये असते. मरिआईवाले देवीच्या नावाने लोकांना आशीर्वाद देऊन चालू वर्षीच्या पावसाचा अंदाज तसेच संक्रांतीबद्दल माहिती सांगत असल्याने लोक त्यांच्या आगमनाची वाट पाहत असतात. मुलांना आमच्यासारखे वाईट दिवस नकोत म्हणून कर्जतला शासकीय वसतिगृह व शाळेत ठेवले असून तीनही मुले आपल्याजवळ नसल्याची वेदना अश्रुरूपातून जाणवली. त्याचप्रमाणे मुलांना चांगले शिक्षण व नोकरी देण्याची सरकारकडून अपेक्षा असल्याचे बोलून दाखविले. तसेच वाढते शहरीकरण व आधुनिकतेमुळे लोकांना मरिआईचे महत्त्व कमी होऊ लागल्याने पहिल्यासारखी कमाई होत नसल्याचेही सांगितले.