‘सात सक्कं त्रेचाळीस’ कादंबरीवरील टीका चुकीची
By admin | Published: September 16, 2014 01:13 AM2014-09-16T01:13:14+5:302014-09-16T01:13:14+5:30
‘सात सक्कं त्रेचाळीस’ हा उद्ध्वस्त करणारा अनुभव आहे. त्या काळात या कादंबरीवर झालेली टीका चुकीची होती. या कादंबरीत जगण्याचे पेच मांडले आहेत,
Next
मुंबई : ‘सात सक्कं त्रेचाळीस’ हा उद्ध्वस्त करणारा अनुभव आहे. त्या काळात या कादंबरीवर झालेली टीका चुकीची होती. या कादंबरीत जगण्याचे पेच मांडले आहेत, एका वेगळ्या विषण्णता अवस्थेत सतत ‘माणूसपण’ शोधण्याचा अनुभव या कादंबरीत असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या आणि समीक्षक पुष्पा भावे यांनी मांडले.
शब्द प्रकाशन आयोजित किरण नगरकर लिखित ‘सात सक्कं त्रेचाळीस’ कादंबरीचे पुन:प्रकाशन सोमवारी रुईया महाविद्यालयाच्या सभागृहात ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून भावे बोलत होत्या. या वेळी लेखक किरण नगरकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, चित्रकार प्रभाकर कोलते, समीक्षक नितीन रेंढे, पत्रकार जयंत पवार आदी मान्यवरांनी कादंबरीविषयी आपले विचार व्यक्त केले.
भावे म्हणाल्या, या कादंबरीचे समीक्षण केलेल्या पहिल्या तीन समीक्षकांपैकी मी एक आहे. या कादंबरीची भाषा ही अनुभव घेण्याची वेगळी पद्धत आहे. या कादंबरीच्या निमित्ताने सांगायचे म्हणजे, त्या काळात या कादंबरीमुळे वा्मयीन वादविवाद होताना दिसले; परंतु आता तसे चित्र नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मात्र तरीही चाळीस वर्षानंतरही मराठी भाषेतही नेकीने अनुभव देणारी ही कादंबरी असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रकार म्हणून मुखपृष्ठ रेखाटलेले हे पहिले आणि शेवटचे पुस्तक असे सांगून चित्रकार प्रभाकर कोलते यांनी या कादंबरीच्या मुखपृष्ठाची कथा उलगडली. कलेच्या क्षेत्रतला ‘अॅब्स्ट्रॅक्ट’पणा मी या कादंबरीत अनुभवला, असे कोलते यांनी सांगितले. तर ही कादंबरी म्हणजे किरणचे स्वगत असून ती वाचकांना भावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
1967 ते 1974च्या कालखंडात या कादंबरीच्या लेखनाची प्रक्रिया सुरू होती, मात्र 1974 साली कादंबरी प्रकाशित झाली त्या वेळी त्या कादंबरीचे समीक्षण करताना ज्या विचारसरणीचा प्रभाव होता, त्याविषयीचा अनुभव ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी उपस्थितांसमोर मांडला.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे वादळ, व्हिएतनामचा संघर्ष, चीनची सांस्कृतिक क्रांती या सर्वाचा विचारांवर होणारा प्रभाव आणि कादंबरीतील मुंबई आणि तिचे वर्णन याचा प्रभाव त्या वेळेच्या कादंबरीच्या समीक्षणातून दिसून आल्याचे केतकर यांनी सांगितले. आता मात्र ही कादंबरी म्हणजे भविष्य काळातील परात्मतेची नांदी असल्याचे त्यांनी अखेरीस सांगितले. (प्रतिनिधी)