पथनाट्यातून जनजागृती : विक्रेत्यांना दिल्या कागदी पिशव्यायवतमाळ : पर्यावरणाला सर्वाधिक धोकादायक ठरणाऱ्या प्लास्टिक निर्मूलनसाठी यवतमाळ पब्लिक स्कूलने पुढाकार घेतला असून संत गाडगेबाबा पुण्यतिथीच्या निमित्ताने यवतमाळ शहरातून काढलेल्या प्लास्टिक निर्मूलन रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती करीत शहरातील विक्रेत्यांना कागदी पिशव्या वितरित केल्या. येथील आझाद मैदानातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोरुन या प्लास्टिक निर्मूलन रॅलीला प्रारंभ झाला. या रॅलीला खासदार भावनाताई गवळी, आमदार मदन येरावार, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, वायपीएस पॅरेन्टस् कौन्सिलच्या अध्यक्ष सुरूची खरे, पॅरेन्टस् कौन्सिलच्या जॉर्इंड सचिव साक्षी सिंधी, प्राचार्य डॉ. जेकब दास यांच्या उपस्थितीत झेंडी दाखविण्यात आली. यानंतर ही रॅली हनुमान आखाडा, गांधी चौक, नेहरू चौक, टांगा चौक, दत्त चौक, बसस्थानक चौक मार्गाने जात येरावार चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर या रॅलीची सांगता झाली. रॅलीत विद्यार्थ्यांच्या हातात असलेले प्लास्टिक निर्मूलनाचे फलक सर्वांचे लक्ष वेधत होते. रॅली दरम्यान प्रत्येक चौकात ज्ञानेश्वर सुरजुसे लिखित ‘मानवाचा मानवाद्वारे आत्मघात’ या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. यातून प्लास्टिक निर्मूलनाविषयी संदेश देण्यात आला. (शहर वार्ताहर)
‘वायपीएस’च्या प्लास्टिक निर्मूलन रॅलीने लक्ष वेधले
By admin | Updated: December 21, 2015 02:34 IST