अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जरा संशय वाटला की लोकांना घरातच क्वारंटाईन करण्याची मोहीम सध्या यवतमाळात जोरात आहे. पण तिला समाजानेच क्वारंटाईन केले, नात्यागोत्यातून विलग केले. आता ती एकटीच पोलीस ठाण्याच्या शेजारी ४० अंश तापमानात तगमगत जगतेय. कोरोना तिला झालेला नाही, समाजाचा हा नेहमीचाच रोना झालाय... हक्काने जगू द्यायचे नाही अन् पंगू केल्यावर काठी घेऊन आधाराला यायचे!यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या पुढून जा.. कोणत्यातरी दुकानाचा आडोसा धरून एक म्हातारी बसलेली आढळेल. सूर्य आग ओकत असताना ती मात्र स्वेटर घालून बसलेली. कोरोनाच्या भीतीपायी सारे आपापल्या घरात चिडीचूप असताना ही म्हातारी उघड्या आकाशाखाली २४ तास. असे का?हा प्रश्न एका वाटसरूने शनिवारी विचारला अन् तिच्या भावनांची संचारबंदी संपली. कधी अश्रू, तर कधी त्रागा होऊन तिच्या पूर्वाश्रमीच्या जीवनाचा लॉकडाऊन तुटत गेला. तिची कडवट कहानी सुरू झाली तलावफैलातल्या वस्तीतून...तिचे नाव मीरा राऊत. नवरा पशुवैद्यकीय दवाखान्यात काही वर्षांपूर्वी नोकरीला होता. दोन पोरं आहेत. दोन दीर आणि दोन जावा आहेत. पण हा सारा गोतावळा आता कुठे राहतो, काय करतो, मीराबाईला ठाऊक नाही. ‘काय कराव बाबू... नवऱ्याले नवकरी व्हती. पण गुण नोहोते ना सुदे.. पोट्टे बी तसेच निंगाले.. कुटी गेले तं माईतबी नाई..’ एकटीच उरलेली मीराबाई राणीसती मंदिरात झाडझुडीचे काम करून जगायची. नगरपालिकेने तलावफैल भागात आपल्याला घरकुल दिले होते, असे ती सांगते. पण दोन वर्षांपूर्वी ‘शिरीमंतायनं मले हाकलून देल्लं थ्या घरातून’ अशी व्यथा सांगताना तिचे डोळे डबडबले.कुठे जावे हे न कळल्याने मीराबाई शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात आली. कुणी काही दिले तर खायचे आणि तिथेच एखाद्या दुकानाच्या पडवीत पडून राहायचे, हा तिचा रतीब. पण आता हा दिनक्रम कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जरा बदलला आहे. रस्त्यावरची वर्दळ थांबली आणि भयाण, भेसूर शांततेत तिच्या पूर्वायुष्यातल्या जखमा मनाला डसून किंचाळू लागल्या आहेत...!दोन वर्षांपासून एकच स्वेटरदोन वर्षांपासून वृद्ध मीराबाई शहर पोलीस ठाण्याच्या शेजारी बेवारस जगतेय. अंगावरचे ब्लाऊज फाटले. मग ‘एका पोलिसीन बाईनं मले झांपर देल्लं. पन थे आखूड हाये. आंगात जात नाई. काई तरी घालाचं म्हणून मंग हे शेटर घालून राह्यते बाबू...’ ही तिची पुढची कहानी. पण सध्याच्या ४० अंश तापमानात २४ तास स्वेटर घालून राहणे म्हणजे किती विव्हळत असेल तिचा आत्मा!पोलीस देतात चहा-पाणीलॉकडाऊनमुळे जाता-येता मिळणारी मदत थांबल्याने मीराबाईचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गहन बनला. सध्या कोणते ना कोणते सामाजिक कार्यकर्ते येऊन जेवणाची पिशवी देऊन जातात. तेवढाच आधार. शिवाय, शहर पोलीस ठाण्यात रात्री हमखास येणारा चहा मीराबाईसाठी पाठविला जातो. दुपारीही पोलीस कर्मचारी आवर्जून येऊन ‘बुढे पाणीगिनी हाये का नाय वं?’ म्हणून विचारून जातातच.
धनिकांनी हिसकावले घर अन् ती उघड्यावर झाली क्वारंटाईन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST
तिचे नाव मीरा राऊत. नवरा पशुवैद्यकीय दवाखान्यात काही वर्षांपूर्वी नोकरीला होता. दोन पोरं आहेत. दोन दीर आणि दोन जावा आहेत. पण हा सारा गोतावळा आता कुठे राहतो, काय करतो, मीराबाईला ठाऊक नाही. ‘काय कराव बाबू... नवऱ्याले नवकरी व्हती. पण गुण नोहोते ना सुदे.. पोट्टे बी तसेच निंगाले.. कुटी गेले तं माईतबी नाई..’ एकटीच उरलेली मीराबाई राणीसती मंदिरात झाडझुडीचे काम करून जगायची.
धनिकांनी हिसकावले घर अन् ती उघड्यावर झाली क्वारंटाईन!
ठळक मुद्दे६५ वर्षीय म्हातारीची व्यथा : ब्लाउज फाटले अन् भरउन्हात स्वेटर घातले!