पत्नीचा आक्रोश : कर्ज काढून खोदलेल्या विहिरीतच आत्महत्याकिशोर वंजारी नेरशेतात पिकत नव्हते, तरीही या-त्या बँकेकडून कर्ज काढून शेतीला लावत होते. बँकांचे पैसे थकले. मुद्दलाऐवढेच व्याज झाले. बँकेचे माणसं घरापर्यंत येऊन वसुलीचा तगादा लावायचे. पैसे भरले नाही तर शेताचा लिलाव करून कोर्टाची नोटीस पाठवू, अशा धमक्या देत होते. याच तगाद्याने जीवन जगणे असह्य झाल्याने माझ्या पतीने आत्महत्या केली, असा आरोप विशालची पत्नी मायाने केला. तालुक्यातील मारवाडी येथील विशाल नामदेव पवार (३५) या शेतकऱ्याने शुक्रवारी सकाळी आपल्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. पालकमंत्र्यांच्या नावाने विनंती पत्र त्याने लिहिले होते. विशाल हा प्रचंड मेहनती शेतकरी होता. स्वत:च्या शेतीसोबतच तो मक्त्याने शेती करून आपल्यावरील कर्ज फेडण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र निसर्ग त्याला साथच देत नव्हता. त्यामुळे त्याने विविध बँकांतून घेतलेल्या कर्जाचा एकही हप्ता भरता आला नाही. याच बँकांनी लावलेल्या तगद्याने शेवटी त्याला या जगाचा निरोप घ्यावा लागला. विशालने १४ सप्टेंबर २०१२ रोजी नेर अर्बन पतसंस्थेकडून दीड लाख रुपयाचे कर्ज उचलले होते. मात्र नापिकीमुळे एक रुपयाही तो भरू शकला नाही. या दीड लाखावर ८० हजार ९२९ रुपये व्याज झाले आहे. या कर्जासाठी त्याने स्वत:चे घर गहान ठेवले होते. गतवर्षी यवतमाळच्या एका कृषी केंद्रातून अडीच लाखांचे उधारीवर बियाणे आणि शेतीसाहित्य खरेदी केले होते. तेही पैसे तो फेडू शकला नाही. पाच वर्षांपूर्वी त्याने यवतमाळच्या राजलक्ष्मी पतसंस्थेतून ७५ हजार रुपये कर्ज काढले होते. या कर्जावर मुद्दलऐवढेच व्याज झाले. दीड लाख रुपये या बँकेचे अंगावर कर्ज होते. एका शिक्षकाकडून २० हजार रुपये कजाऊ घेतले होते. मुद्द दिल्यानंतर कर्जाच्या रकमेसाठी विशालने त्या शिक्षकाला धनादेश दिला. परंतु तो अनादरित झाल्याने सदर शिक्षकाने न्यायालयात केस दाखल केली. या सोबतच युनियन बँक आणि स्टेट बँकेचेही कर्ज असल्याची माहिती आहे. त्याच्या सातबारावर साडेचार लाख रुपयांचा बोझा आहे. कोणत्याही बँकेने नोटीस बजावली नसली तरी शेताचा लिलाव करून कोर्टात प्रकरण नेऊ, असे बँकेचे कर्मचारी धमकी देत होते. या सर्व प्रकाराने विशाल हतबल झाला होता, असे पत्नीने सांगितले.
विशाल ठरला बँक कर्जाच्या तगाद्याचा बळी
By admin | Updated: December 20, 2015 02:32 IST