यवतमाळ विधानसभा : ग्रामीण मतदारांवर विजयाचे गणित अवलंबून यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार हे शहरी भागातील आहेत. ग्रामीणमध्ये त्यांचा संपर्क असला तरी ते मतदान पदरी पाडून घेण्यासाठी त्यांना पक्षातील इतरांवर अवलंबून रहावे लागणार आहे. यवतमाळ मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण जिल्हा मुख्यालयाचा हा मतदारसंघ ताब्यात असावा म्हणून सर्वच पक्ष प्रयत्न करतात. याच कारणावरून राहुल ठाकरे यांनी आपला दिग्रस-दारव्हा मतदारसंघ सोडून यवतमाळात धाव घेतली. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया, भाजपाचे माजी आमदार मदन येरावार, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे चिरंजीव राहुल ठाकरे, शिवसेनेचे संतोष ढवळे, बसपाचे शारीक लोखंडवाला आदी प्रमुख उमेदवार आहेत. हे सर्व उमेदवार यवतमाळ शहर व परिसरात राहणारे आहेत. या पैकी कुणाचेही ग्रामीणमध्ये वास्तव्य नाही. बाबासाहेब गाडे पाटील हे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यांनी भाजपाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले होते. मात्र ऐनवेळी त्यांना डावलण्यात आले. राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करताना त्यांना विधानसभेचा शब्द दिला गेला होता. मात्र तो पाळला गेला नाही. गाडे पाटील यांची अकोलाबाजार, आकपुरी परिसरातील गावांमध्ये भक्कम पकड आहे. मात्र उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहेत. त्यांनी माघार घ्यावी म्हणून भाजपातून दबाव वाढविला जात आहे. त्यात यश येते का, याकडे लक्ष लागले आहे. त्यांनी माघार घेतलीच तर ते नाराज असूनही पक्षासाठी किती प्रामाणिक प्रयत्न करतात, हे पाहणे महत्वाचे ठरेल. भाजपाची शहरात तर शिवसेनेची ग्रामीणमध्ये पकड आहे. त्यामुळे शहरातून अधिक मते मिळविण्यावर भाजपाचा भर राहील. काँग्रेस उमेदवाराची ग्रामीणमध्ये तेवढी पकड नाही. यासाठी त्यांना आपल्या पक्षातील पकड असलेल्या एका पदाधिकाऱ्यावर अवलंबून रहावे लागेल. मात्र सदर पदाधिकारी मावळत्या आमदार नंदिनी पारवेकर यांचे निकटवर्तीय आहेत. नंदिनी पारवेकरांचे तिकीट कापल्याने त्यांचा व्यक्तीश: प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंवर रोष आहे. आपले तिकीट कापून मुलाला उमेदवारी दिल्याने खरी नाराजी आहे. नंदिनी यांची नाराजी असताना काँग्रेसमधील ते पदाधिकारी खरोखरच राहुल ठाकरेंसाठी किती ताकदीने राबतील, हे महत्वाचे ठरणार आहे. प्रचाराचे नारळ फोडताना या पदाधिकाऱ्याला प्राधान्य देऊन आपलेसे करून घेण्याची धडपड काँग्रेसने चालविली आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील बहुतांश उमेदवार शहरातील रहिवासी असल्याने शहरी मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात होणार एवढे निश्चित आहे. ग्रामीण मते विजयश्री निश्चित करू शकतात. ही मते जास्तीत जास्त कुणाला मिळतील यावर त्या उमेदवाराचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे. पहिल्यांदाच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा स्वतंत्रपणे लढत असल्याने आतापर्यंतच्या युती-आघाडीच्या मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात होणार आहे. ते थांबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राजकीय पक्षांकडून होणार आहे. मत विभाजन टाळण्यासाठी आपल्या सोईच्या अपक्ष उमेदवारांना बसविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यात कितपत यश येते हे १ आॅक्टोबरला स्पष्ट होईल. (जिल्हा प्रतिनिधी)
शहरी उमेदवारांचीच भाऊगर्दी
By admin | Updated: September 29, 2014 23:11 IST