शेतकऱ्यांचे प्रश्न : सातबारा कोरा करण्याची मागणीयवतमाळ : दुष्काळी परिस्थितीने शेतकरी अडचणीत सापडले आहे. अशा स्थितीत शासनाने शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे. मात्र केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारीत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सातबारा कोरा करा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे देण्यात आले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, खरीप हंगामासाठी तत्काळ कर्ज द्यावे, राष्ट्रीयकृत बँकांच्या जाचक अटी रद्द कराव्यात, नवीन सभासदांना कर्ज मंजूर करावे, शेतकऱ्यांना अनुदानावर बी-बियाणे देण्यात यावे, शेतावर राबणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरी देण्यात यावी, जिल्हा बँकेला वित्त पुरवठा करणाऱ्या शिखर बँकेला तत्काळ कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी सकाळी येथील जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, महिला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष क्रांती धोटे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती लता खांदवे, पंचायत समितीच्या माजी सभापती सपना लंगोटे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक, वसंतराव घुईखेडकर, उत्तमराव शेळके, सुरेश चिंचोळकर, मुबारक तंवर, विवेक देशमुख यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांना देण्यात आले. (शहर वार्ताहर)शेतकऱ्यांनो, राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या पाठीशी भाजपा-सेना युती सरकारने निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना मोठे आश्वासन दिले होते. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा मुद्दा अग्रक्रमावर होता. प्रत्यक्षात कर्जमाफी झालीच नाही. कर्जाचे पुनर्गठणही केले नाही. हवालदिल शेतकरी वणवन भटकत आहे. त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी असून शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, असे आवाहन आमदार संदीप बाजोरिया यांनी येथे पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांनी काँग्रेस, भाजपा आणि सेनेच्या दुटप्पी धोरणावर चांगलीच आगपाखड केली. सरकारने विकास कामांना दहा टक्के कात्री लावली आहे. त्याचा परिणाम विकास कामांवर होत आहे. तसेच शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर शासनाने तोडगा काढला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला.
राष्ट्रवादीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
By admin | Updated: June 23, 2015 00:35 IST