वसतिगृहातील कोंडवाडा : अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न दिग्रस : येथील आदिवासी वसतिगृहांची अतिशय दयनीय अवस्था आहे. अस्वच्छतेमुळे वसतिगृहातील विद्यार्थी मरणयातना भोगत असल्याचे दिसून येते. मुलांच्या आदिवासी वसतिगृहामध्ये ९० विद्यार्थी शिक्षणासाठी आहेत. या वसतिगृहाची अतिशय खस्ता हालत झाली असून, एकही कर्मचारी तेथे उपलब्ध नसतो. वसतिगृह व परिसरात अस्वच्छता पराकोटीला पोहोचले आहे. स्वच्छतालयांची अवस्था अत्यंत विदारक होत आहे. ज्यामुळे रोगरार्इंचा फैलाव सहजतेने होऊ शकतो. विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी पुरेसे पलंग उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपावे लागते. वसतिगृह व्यवस्थापनाने हिवाळ््यात ब्लँकेटची व्यवस्था करायला पाहिजे, परंतु ही व्यवस्थासुद्धा केली जात नाही. सध्या कडाक्याच्या थंडीने जोर पकडला असून, विद्यार्थ्यांना योग्य आंथरून-पांघरुनही दिले जात नाही. वसतिगृहाच्या स्वयंपाकगृहामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून, भाजीपाल्यासह इतर खाद्यपदार्थ अस्ताव्यस्त पडलेले दिसून येतात. कोणत्याही प्रकारची येथे स्वच्छता नसते. वसतिगृहाच्या कार्यालयात बसण्यासाठी साधी खुर्चीसुद्धा उपलब्ध नाही. आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शासनाकडून सर्व सोयीसुविधा पुरविल्या जात असतानाही कर्मचारी मात्र विद्यार्थ्यांना या सुविधांपासून वंचित ठेवत असल्याचे दिसून येते. वसतिगृहाच्या अधीक्षकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध नव्हते. हे अधीक्षक आठ-आठ दिवस इकडे फिरकत नसल्याचे कळले. बाहेरगावावरून ये-जा करीत असल्याने त्यांना वाटेल तेव्हा ते येतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरही कुणाचा वचक नाही. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांनी येथे येऊन कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केल्याचे वृत्त आहे. तरीसुद्धा परिस्थितीत कोणतीही सुधारणा दिसून आली नाही. शासकीय वसतिगृहाकडे प्रकल्प अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे पूर्णत: दुर्लक्ष असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. विद्यार्थ्यांसाठी शासन लाखो रुपये खर्च करते. परंतु हा पैसा प्रमाणिकपणे त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. याला जबाबदार असलेले सर्व संबंधित कर्मचारीच नव्हे तर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई मागणी पालकवर्गातून होत आहे. (शहर प्रतिनिधी)
विद्यार्थी भोगताहेत मरणयातना
By admin | Updated: December 8, 2014 22:40 IST