नांदेपेरा : यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्याने जमिनीत ओलावा कमी झाला आहे़ त्यामुळे उष्ण वातावरणामुळे कापूस, सोयाबीन या पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे़ कपाशीवर दुधाळ, पांढरी माशी, मर्ग यांनी आक्रमण केले आहे. कपाशीवर रोग आल्याने शेतकरी संकटात सापडले आहे़ शिवाय पावसाअभावी सोयाबीन हे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़ अगोदरच शेतकरी दुबार-तिबार पेरण्यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांच्या जवळील पैसा खर्च झाला आहे. परिणामी या रोगांना नियंत्रण आणण्याकरिता किटकनाशके कसे खरेदी करावे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.कपाशी, सोयाबिनला जगविण्यासाठी किटकनाशके खरेदी करावे, की पोळा सण साजरा करावा, अशा विवंचनेत शेतकरी भरडले जात आहे. तरीही सणासाठी जमा केलेले पैसे शेतकरी किटकनाशक खरेदीसाठी वापरत आहे़ यामुळे शेतकऱ्यांचा महत्वाचा सण यावर्षी कोरडाच जाणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे़ पिकांचे रोगांपासून संरक्षण कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़ जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणात कापूस पिकाची लागवड केली जाते. पर्यायी पीक म्हणून कपाशीसोबत सोयाबीनचीही लागवड केली जाते. सोयाबिनचे पीक दिवाळी साजरी करण्यासाठी उपयोगी पडते, असा शेतकऱ्यांचा समज आहे़ परंतु यावर्षी अपुऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकाला अजूनपर्यंत फुलेसुध्दा लागली नाही़ त्यामुळे अळीने आक्रमण केले असून झाडे रिकामी होत आहे़ काही शेतांतील सोयाबीन पूर्णत: नष्ट झाले आहे़ कृषी विभागामार्फत अनुदानावर कोणत्याही प्रकारचे किटकनाशक पुरविले जात नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या धोरणाविषयी शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे़ शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चारा-पाण्याच्या प्रश्नही उभा ठाकला आहे़ पाऊस आज ना उद्या पडेल, या आशेने शेतकरी चातकासारखे आकाशाकडे टक लावून पावसाच्या प्रतीक्षेत आहे़ परंतु बळीराजा संकटात असताना लोकप्रतिनिधी व प्रशासन सुस्तच असल्याचे दिसून येत आहे़ कृषीप्रधान देशात शेतकरी संकटात असताना कोणत्याही सामाजिक संस्थाही त्यांना आर्थिक मदत देण्यास समोर येताना दिसून येत नाही़ शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने बाजारपेठही थंडावल्या आहे़ (वार्ताहर)
सोयाबीन, कपाशीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव
By admin | Updated: August 24, 2014 23:47 IST