यवतमाळ : नवनिर्मित वडगाव वन परिक्षेत्राच्या हद्दीतील धानोरा बिटमधील लालगडी मारुती मंदिर परिसरात शेकडो सागवान वृक्षांची कत्तल करून तस्करी करण्यात आली. या तस्करीतील टोळी हाती लागूनही दक्षता पथकाने केवळ बयाण नोंदवून त्यांना सोडून दिले. त्यामुळे पथकाच्या कार्यप्रणालीवर संशय उपस्थित होत आहे. धानोरा बिटमधील वन जमिन आणि महसुली जमिनीवरील शेकडो परिपक्व सागवान वृक्षांवर हातआरी चालवून कत्तल करण्यात आली. तसेच व्हॅनच्या सहाय्याने तस्करांच्या टोळीने या लाकडाची विल्हेवाट लावली. स्थानिक क्षेत्र सहाय्यक आणि वन रक्षकांचे टोळीच्या सूत्रधाराशी आर्थिक हितसंबंध असल्याने अनेकदा हा प्रकार उजेडात येवूनही तो दडपण्यात आला. एवढेच नाही तर तीन दिवसांपूर्वी येथील धामणगाव मार्गावरील सुरेशनगरात यवतमाळ वन विभागाच्या दक्षता पथकाने एका फर्निचर कारखान्यावर धाड घातली. या वेळी तेथे तस्करीतील सागवान रिपा, पाट्या आणि त्यापासून तयार केलेली दाराची चौकट, सोफा असे कटसाईज लाकूड जप्त करण्यात आले. पंचनाम्यात वन विभागाने या लाकडाची किमत ५० ते ६० हजार रुपये असल्याचे दर्शविले आहे. कारखान्यावर धाड घातल्यानंतर दक्षता पथकाने तेथे काम करीत असलेल्या ज्ञानेश्वर बाबासाहेब थोरात (४२) रा.सुरेशनगर मोहा, अरुण शामराव प्रधान (४५) रा.शास्त्रीनगर, सिद्धार्थ रामकृष्ण चहांदे (५०) रा.आंबेडकरनगर या तिघांची बयाणे नोंदवून त्यांना सोडून दिले. वास्तविक हे लाकूड कोठून आणले, तस्करीत कुणाकुणाचा सहभाग आहे याची पाळेमुळे खनून काढण्यासाठी त्यांची वन कोठडी मिळविणे अपेक्षित होते. मात्र एका क्रेशर मालक असलेल्या कंत्राटदाराच्या दबावापोटी आणि राजकीय हस्तक्षेपातून ही चौकशीच दडपण्यात आली. या टोळीचे थेट धानोरातील सागवान कत्तल आणि तस्करीशी संबंध असल्याचे खुद्द वन विभागातून सांगण्यात आले. त्यामुळे दक्षता पथकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय वन कर्मचाऱ्यांच्या रात्र गस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
धानोरा बिटमध्ये शेकडो सागवान वृक्षांची तस्करी
By admin | Updated: August 24, 2014 23:46 IST