यवतमाळ : जलयुक्त शिवार अभियानातून अतिशय छोटी कामे अपेक्षित नाही. यामधून मोठी आणि अधिक शेतकऱ्यांना फायदा देणारी कामे घेणे आवश्यक आहे. यासोबतच नवीन सिमेंट नाला बंधाऱ्यांची कामे घेण्यापेक्षा जुन्या बंधाऱ्यांच्या दुरूस्तीची कामे प्राधान्याने घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी गुरूवारी दिले. महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवाय अभियान जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकर्णी, रोहयो उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, जिल्हा नियोजन अधिकारी डी.टी.राठोड, लघु सिंचन स्थानिक स्तरचे कार्यकारी अभियंता कुंभारे यांच्यासह जलयुक्त यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियान लहान कामांसाठी नाही. अशी कामे नियमित निधीतून केली जावू शकतात. अभियानातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अधिक फायदा देणारी कामे अपेक्षित आहे. त्यामुळे लहान कामे घेऊ नये, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावर्षी बरेच सिमेंट नाला बंधारे बांधण्यात आले. जुनेही अनेक बंधारे आहेत. नवीन बंधारे प्रस्तावित करण्यापेक्षा सध्या अस्तित्वात असलेल्या बंधाऱ्यातून गाळ काढण्याच्या कामांसह दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य द्या. जिल्ह्यातील कोल्हापूर पद्धतीचे नादुरूस्त बंधारे अभियानातून पूर्ण करण्यासाठी प्रस्ताव करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत केल्या. यावर्षीच्या पावसामुळे बंधारे पाण्याने भरले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यातील गाळ काढणे सद्या शक्य नाही. मात्र डिसेंबरमध्ये बंधाऱ्यात पाणी राहण्याची शक्यता कमीच असते. अशा यावर्षी बांधलेल्या किंवा जुन्या बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी आवश्यक तयारी करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. सदर कामे जलयुक्त सोबतच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतूनसुद्धा घेता येणार असल्याने त्यांचे प्रस्ताव तयार ठेवण्यात यावे. जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग फार महत्वाचा आहे. त्यासाठी जनजागृतीवर भर देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत केली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात याव्या. या स्पर्धेत चांगला सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्याबाबतही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जलयुक्त अभियानाशी संबंधीत सर्व यंत्रणांचा काम व तालुकानिहाय आढावा घेतला. त्यात कृषी विभाग, वन विभाग, लघु सिंचन स्थानिक स्तर, जिल्हा परिषद सिंचन विभाग, पाणी पुरवठा विभाग, भूजल सर्व्हेक्षण विभाग आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
जलयुक्त शिवार अभियानात लहान कामे अपेक्षित नाही
By admin | Updated: August 1, 2015 03:47 IST