वाहनांची रांग : वणी येथील विश्रामगृहात भरली वाहनांची जत्रावणी : येथील विश्रामगृहात शुक्रवारी उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे शिबिर घेण्यात आले. या शिबिरामुळे वाहनधारक व प्रवाशांची प्रचंड तारांबळ उडाली. खुद्द ‘आरटीओं’नीच तारांबळ उडविल्यामुळे गोची झाली. येथे दर महिन्याला उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे निश्चित तारखेला वाहन चालक परवाना, वाहन तपासणी शिबिर घेतले जाते. शुक्रवारी विश्रामगृहात हे शिबिर घेण्यात आले. त्यासाठी सकाळपासूनच वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील दुचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहनधारक विश्रामगृह परिसरात दाखल होऊ लागले होते. परिणामी सकाळी ११ वाजतापर्यंत विश्रामगृहाला वाहनांच्या जत्रेचे स्वरूप आले होते. सर्व दुचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहने अस्ताव्यस्त उभी होती. आरटीओ विभागाचे अधिकारी, कर्मचारी आल्यानंतर शिबिराला सुरूवात झाली. यावेळी चालक परवाना, वाहन पासींग आदींसाठी वाहनधारकांची मोठी रांग लागली होती. बाजूला सर्व वाहने उभी होती. विश्रामगृहाच्या प्रवेशव्दारापासून शिबिरस्थळी पोहोचण्यासाठी वाहनधारकांनाच कसरत करावी लागत होती. रस्त्याच्या दोन्ही कडेला अस्ताव्यस्त वाहने उभी असल्याने मागाहून येणाऱ्या वाहनधारकांना विश्रामगृहात प्रवेश करणेही कठीण झाले होते. येथील विश्रामगृहात माणसे कमी आणि वाहनेच जादा दिसत होती. मात्र उपप्रादेशिक परिवहन विभागाने शिबिरासाठी कोणतीही खास व्यवस्था केली नव्हती. एवढेच नव्हे, तर वाहनधारकांनाही वाहन कसे व कुठे पार्किंग करावे, याबाबत साधी सूचना दिली गेली नाही. त्यामुळे शुक्रवारी येथील विश्रामगृह परिसराला वाहनांच्या जत्रेचे स्वरूप आले होते. (कार्यालय प्रतिनिधी)संपामुळे प्रवाशांची कुचंबणागुरूवारपासून एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपामुळे येथील आगारातून एकही बस सुटली नाही. परिणामी प्रवासी खासगी वाहतुकीवर अवलंबून होते. त्यातच शुक्रवारी येथे शिबिर झाले. या शिबिरात मोठ्या प्रमाणात आॅटो आणि चारचाकी वाहने विविध कामासाठी आली होती. त्यामुळे नेहमी निश्चित मार्गावर धावणारी अनेक वाहनेही बंद होती. त्याचा फटका प्रवाशांना बसला. एसटी बंद असल्यामुळे बहुतांश प्रवासी याच वाहनांवर अवलंबून होते. मात्र त्यापैकी बहुतांश वाहने तपासणीसाठी आल्याने प्रवाशांची एकच तारांबळ उडाली होती. खुद्द ‘आरटीओं’नीच प्रवाशांची तरांबळ उडविली, असे काही प्रवासी सांगत सुटले होते. पुढील शिबिर घेताना वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, याची दक्षता घेणे आता गरजेचे झाले आहे.
‘आरटीओं’नी उडविली तारांबळ
By admin | Updated: December 19, 2015 02:27 IST