यवतमाळ : नगरपरिषदेच्या हद्दवाढीने लोहारा येथील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये असलेल्या उद्योगनगरातील नागरिक उघड्यावर आले आहेत. मूलभूत सोयी सुविधांसाठी जायचे कुणाकडे हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. आंदोलन करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे गाव कृती समिती स्थापन्यात आली. त्यांनी भोयर ग्रामपंचायतीत जाण्याचा ठराव घेतला आहे.हद्दवाढीत लोहारा ग्रामपंचायतीत असलेली एमआयडीसी परिसरातील वसाहत वगळण्यात आली. हा निर्णय कॅबिनमध्ये बसून घेतला. अधिकारी वर्गाने यामुळे काय अडचणी निर्माण होतील याचा विचार केला नाही. भीषण पाणीटंचाईच्या काळात टँकर कोणाकडे मागायचा, घरकुलाची योजना, विविध दस्तावेजासाठी लागणारे दाखल कोणाकडे मागायचे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नगरपरिषद हद्दवाढ जानेवारी महिन्यात करण्यात आली. त्यानंतर पाच महिने लोटूनही उद्योगनगर परिसरासाठी कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. १९८५ पासून लोहारा ग्रामपंचायतीत सन्मानाने वास्तव्य करणाऱ्या उद्योगनगरवासीयाना आता स्वत:ची ओळख कायम ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी ६ मे रोजी ग्रामसभा घेऊन लगतच्या भोयर ग्रामपंचायतीत जाण्याचा निर्णय घेतला. या ठरावाची प्रत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे. या सोबतच आमदार मदन येरावर यांचे शिफारसपत्रही देण्यात आले आहे. यावर जिल्हा परिषद सीईओ काय निर्णय घेतात, की हा प्रस्ताव ग्रामविकास मंत्रालयाकडे पाठविला जाणार हे अजूनही स्पष्ट झाले नाही. (कार्यालय प्रतिनिधी)
हद्दवाढीने लोहारातील उद्योगनगरवासी उघड्यावर
By admin | Updated: May 18, 2016 02:45 IST