चिमुकल्यांना सुदृढ आरोग्याची संजीवनीयवतमाळ : सर्वसामान्य कुटुंबातील गरोदर मातेची प्रसूती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली. नियतीने बाळतंपण सातव्या महिन्यातच केलं. गर्भातील तिळ््यांंची वाढ झालीच नाही. कसेबसे काही ग्रॅम वजनाचे तीन जीव जन्माला आले. त्यांना हवी होती अतिदक्षता आणि आधुनिक उपचार. डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारलं. आता ती तिन्ही बाळ सुखरूप आहेत. एका गरीब दाम्पत्याला कोणत्याही आर्थिक भुर्दंडाशिवाय अपत्य सुखसोबत माणुसकीचे दर्शनही झाले. आर्णी तालुक्यातील शिरपूर येथील संगीता सावन पवार यांना निसर्गाने दोन मुले आणि एका मुलीची भेट दिली. आईच्या गर्भात या मुलांची पूर्ण वाढ झालीच नाही. संगीताला अचानक पोट दुखत असल्याने शासकीय रुग्णालयात दाखल केले. २१ मे रोजी तिने दोन मुलं आणि एका मुलीला जन्म दिला. सर्व सुखरूप पार पडले तरी बाळ अगदी २९ आठवड्यातच जन्माला आली होती. किमान ४० आठवड्यानंतरच नवजात बाळांसाठी बाहेरील वातावरण सुरक्षित मानले जाते. मात्र या कमी दिवसांच्या चिमुकल्यांचे पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा बालरोग विभागातील अधिव्याख्याता डॉ.विशाल चव्हाण पुढे आले. त्यांनी यांनी योग्य उपचार आणि सुविधा उपलब्ध करून दिली. निवासी डॉक्टर, स्टाफ नर्स या सर्वांनीच या तिळ्यांंची काळजी घेतली. याचा परिणाम दोन महिन्यानंतर दिसून आला. हे तिनही बालक एकदम तंदुरूस्त झाले असून आता त्यांची सुदृढ बालकाप्रमाणे वाढ होत आहे. एनआयसीयूमध्ये महिनाभराच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात तब्बल दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. इतकी रक्कम संगीता आणि सावन या दाम्पत्याकडे जुळणे अशक्यप्राय होते. मेडिकलच्या डॉक्टरांनी पुढाकार घेतल्याने कमी दिवसात जन्माला असलेल्या बाळांना नवसंजीवनीच मिळाली आहे. यासाठी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड, बालरोग विभाग प्रमुुख डॉ. कांबळे यांनी मार्गदर्शन केले. शिवाय निवासी डॉक्टर तौसीफ, डॉ.सागर, डॉ. अंकीता बगाडीया यांनी विशेष काळजी घेतली. शासकीय रुग्णालयातही अतिशय दर्जेदार उपचार देणे शक्य असल्याचे यातून दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी) कमी दिवसात जन्माला आलेल्या मुलांना मेंदूत रक्तस्त्राव होण्याची भीती असते. रक्तदाब सतत कमी-जास्त होतो, श्वसनाचा त्रास, कुठल्याही प्रकारच्या संसर्गाची भीती, पोटाचे विकार, रक्ताची शौच (नेक्रोटायलीन इंटोरो क्रोलाटीस) होण्याची शक्यात अधिक असते. सर्वात धोकादायक म्हणजे ही बालक आईच्या अंगावर दुध घेऊ शकत नाही. त्यामुळे धोका असतो.
तिळ्यांना पुनर्जन्म : ‘मेडिकल’च्या यंत्रणेची किमया
By admin | Updated: July 20, 2015 02:23 IST