महावितरणचे दुर्लक्ष : वाहिन्या तुटण्याची भीती लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : पावसाच्या सरी कोसळता वीज खंडित होत असल्याने पुसद तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहे. पावसाने हजेरी लावल्याने एकीकडे बळीराजा सुखावला. मात्र दुसरीकडे वीज वितरणच्या कारभाराने नागरिक त्रस्त आहेत. दरवर्षी पावसाळा आला की विजेचा लपंडाव सुरू होतो. परंतु यावर आतापर्यंत कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. पावसाळा तोंडावर आल्याने सोसाट्याच्या वाऱ्यात झाडाच्या फांद्या विद्युत तारेवर पडून विद्युत वाहिन्या तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणने याकडे लक्ष देवून यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. ८ जूनच्या रात्री विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाल्याने पुसद शहरासह परिसरात रात्रीपासून खंडित वीज पुरवठा झाला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. शहरात दुपारी ३.३० वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला. तोपर्यंत पुसदकर उकाड्याने त्रस्त झाले होते. वीज खंडित झाल्यानंतर नागरिकांना विजेअभावी उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सध्या विद्यार्थी राज्यसेवा, बँकींग, स्टाफ सिलेक्शन, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक या स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहे. मात्र सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत आहे. याकडे महावितरणने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
खंडित वीजपुरवठ्याचा पुसद तालुक्याला फटका
By admin | Updated: June 11, 2017 00:27 IST