चार महिन्यांपूर्वी बांधकाम : वाढोणाबाजारच्या नागरिकांपुढे पुन्हा समस्याराळेगाव : बांधकामाचे सर्व मापदंड गुंडाळून ठेवत निर्माण झालेला २५ लाख रुपयांचा पूल पहिल्याच पावसात वाहून गेला. नवीन पुलावरून ये-जा करण्याची नवाईही फिटत नाही तोच वाढोणाबाजार येथील नागरिकांना भग्न झालेल्या मार्गावरून वाट काढावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या बोगस कारभाराचा हा उत्कृष्ट नमुना आहे. वाढोणाबाजार ते वडकी रोड या अप्रोच रस्त्यावर २०१५ या आर्थिक वर्षात पूल बांधकामास मंजुरी मिळाली. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने फेब्रुवारी २०१५ मध्ये या कामाचा मुहूर्त साधला. सुमारे २५ लाख रुपये खर्च करून या पुलाची निर्मिती करण्यात आली. मात्र काम सुरू असताना जिल्हा परिषदेच्या तज्ज्ञांनी कधीही याची तपासणी केली नसावी किंवा कंत्राटदाराला सुट दिली असावी हे आता स्पष्ट होत आहे. या पुलावर टाकण्यात आलेल्या स्लॅबची जाडी केवळ दोन इंच आहे. दररोज शेकडो वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ राहणाऱ्या पुलाची जाडी किती असावी हे सांगण्यासाठी कुण्या तज्ज्ञाची गरज नाही. मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी आणि या पुलाचे काम घेतलेल्या कंत्राटदाराने केवळ दोन इंच स्लॅब टाकूण आपल्या ‘कार्यकुशलते’चा परिचय दिला आहे. पुलाचे आयुष्य खुप नाही, ही बाब आधीच स्पष्ट होती. मात्र आता पहिल्याच पावसात पूल वाहून गेल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले. वाढोणा बाजार परिसरात गुरूवारी जोरदार पाऊस झाला. नाले दुथडी भरून वाहिले. सदर पूल या पहिल्याच पावसात वाहून गेला. सोबतच लगतचा डांबरी रस्त्यानेही झालेल्या कामाचे पितळ उघडे पाडले. पुलाचा काही भाग आणि डांबरी रस्ताही वाहून गेल्यामुळे आता वाढोणाबाजार गावातील नागरिकांना वडकी रोडवर येण्यासाठी जुन्याच मार्गाचा उपयोग करावा लागणार आहे. नव्याने झालेल्या पुलामुळे हा फेरा कमी होणार होता. सदर कामाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
पहिल्याच पावसात वाहून गेला २५ लाखांचा पूल
By admin | Updated: June 25, 2015 02:28 IST