यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ख्वाजा बेग यांच्या आमदारकीचे मार्केटिंग करताना आम्हीही तुमच्या सोबत आहोत असा संदेश अल्पसंख्यक समाजाला देण्याचा प्रयत्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा बुधवारी येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संपर्क मंत्री मनोहरराव नाईक, आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या मेळाव्याच्या माध्यमातून अल्पसंख्यक समाजाला काँग्रेसच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा तुमच्या पाठीशी आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. राष्ट्रवादीने ख्वाजा बेग यांना विधान परिषदेवर घेतले. बुधवारी राष्ट्रवादीच्या या मेळाव्यात बेग यांचा सत्कारही आयोजित केला होता. यानिमित्त उमरखेड येथील जनाब इनायतउल्ला खॉ आणि दिग्रस येथील जावेद पटेल यांची भाषणे झाली. राष्ट्रवादीने ख्वाजा बेग यांना आमदारकी देऊन अल्पसंख्यक समाजाला न्याय दिल्याची भावना या दोनही नेत्यांनी आपल्या भाषणातून बोलून दाखविली. या माध्यमातून बेग यांच्या आमदारकीची अल्पसंख्यक समाजात मार्केटिंग केली जात असल्याची भावनाही कार्यकर्त्यांमधून व्यक्त होताना दिसून आली. हाच धागा पकडून राष्ट्रवादीचे नेते आमदार संदीप बाजोरिया यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, ख्वाजा बेग यांना विधान परिषदेवर घेतले जावे म्हणून जिल्ह्यातील नेत्यांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले होते. त्यांच्याकडे तशी मागणी केली गेली. तेव्हा ख्वाजा बेग यांचे नाव आधीच निश्चित झाले असल्याचे पवार यांनी सांगितल्याची माहिती बाजोरिया यांनी दिली. राज्यभर गाजत असलेल्या सिंचन घोटाळ्यावर बोलताना संदीप बाजोरिया म्हणाले, काँग्रेसचे मंत्री कामच करीत नाही. त्यामुळे त्यांच्यावर टीका होण्याचा प्रसंगच येत नाही. या उलट स्थिती राष्ट्रवादीची आहे. राष्ट्रवादीचे मंत्री झोकून देऊन काम करतात, त्यामुळे त्यांना टिकेचा सामना करावा लागतो. यावेळी अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक यांनीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या जुन्या व तळागाळातल्या कार्यकर्त्यांना कधीही विसरत नसल्याचे सांगितले. ख्वाजा बेग यांना मिळालेली आमदारकी ही पक्षाच्या याच धोरणाचा एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांचे पक्षाच्या जुन्या-नव्या सर्व कार्यकर्त्यांवर बारिक लक्ष राहते, ते आपल्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष नावाने ओळखतात ही बाब सामान्य कार्यकर्त्यांसाठी खूप मोठी आणि तेवढीच महत्वाची ठरत असल्याचे मनोहरराव नाईक यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात जागा वाढवून घ्यायच्या असल्याचे सूतोवाचही ना. नाईक यांनी यावेळी केले. या मेळाव्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. काहींनी ग्रामीण भागात पक्षस्तरावर असलेले गटतट मोडीत काढून आगामी विधानसभेसाठी एक दिलाने काम करावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमात नवनियुक्त आमदार ख्वाजा बेग यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. नुकतीच काँग्रेसची झालेली कार्यकारिणी बैठक प्रचंड वादळी ठरल्याने राष्ट्रवादीच्या बैठकीकडेही लक्ष लागले होते. परंतु ही बैठक शांततेत पार पडली. (जिल्हा प्रतिनिधी)
ख्वाजा बेगच्या आमदारकीचे मार्केटिंग
By admin | Updated: June 19, 2014 00:16 IST