लोकमत न्यूज नेटवर्क मुकुटबन : शुक्रवारी सकाळी व सायंकाळी एकापाठोपाठ माणसांवर हल्ले करणाऱ्या वाघाची पंचक्रोशीत दहशत तयार झाली आहे. शनिवारी वन विभाग व पोलिसांच्यावतीने हिरापूर व मांगलीसह परिसरातील गावांमध्ये दवंडी देऊन गावकऱ्यांना शेतात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, हल्लेखोर वाघाने शनिवारी सकाळी हिरापूर शिवारात एका कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची चर्चा परिसरात होती. मात्र या घटनेला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. सध्या या परिसरातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत लागला आहे. अशातच शनिवारी मांगली व हिरापूर येथे वाघाने हल्ला करून तिघांना जखमी केले. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. हल्लेखोर वाघ अद्यापही याच भागात वावरत असल्याचे सांगण्यात येते. शनिवारी घडलेल्या घटनेनंतर नागरिक घराबाहेर निघण्याचेही टाळत आहेत. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी पोलिसांच्या मदतीने वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. सध्या वाघाचा वावर याच परिसरात असल्याने शेतकरी व शेतमजुरांनी सध्या शेतात जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे. वाघाला जंगलाकडे पिटाळून लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
मांगली, हिरापूर वाघाच्या दहशतीत
By admin | Updated: June 11, 2017 00:32 IST