दोन महिने लोटले : जिल्हा परिषद प्रशासनाकडून टोलवाटोलवीयवतमाळ : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मे महिन्यापासून वेतनच मिळाले नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत आरोग्य विभागातील प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येते. जिल्हाधिकारी हे त्यांच्या प्रत्येक आढावा सभेत कर्मचाऱ्यांना एक तारखेला वेतन अदा करा असे निर्देश देतात. ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांकडून कामाची अपेक्षा ठेवता त्यांना त्याचप्रमाणे सेवेतील त्यांचे हक्कही मिळवून द्या असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी विभागप्रमुखांना दिले आहे. मात्र त्यानंतरही जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची वनवन कायम आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हक्काचा पगारही वेळेवर दिला जात नाही. परिणामी या कर्मचाऱ्यांपुढे दैनंदिन गरजा भागविण्यासाठी दुसऱ्यापुढे हात पसरण्याची वेळ येते, ही बाब प्रशासनातील कर्मचारी म्हणून शोभणारी नाही. याशिवाय आरोग्यतील कर्मचाऱ्यांना १२ व २४ वर्षांपासून कालबद्ध पदोन्नतीचा लाभही देण्यात आला नाही. सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे पाच हप्ते जमा करण्याची मुदत संपली मात्र त्याचा एकही हप्ता कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. अंशदान निवृत्ती वेतनातून कपात झालेल्या रकमेचा कुठेच हिशोब नाही. जिल्हास्तरावर अनेक आंदोलने झालीत, चर्चा झाली, आश्वासने मिळाली परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे संघटनेने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलनाचा निर्णय घेतला. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र यापैकी एकही आश्वासन अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही. आरोग्य विभागातील अनेक प्रकरणे जिल्हा परिषदेच्या विरोधात न्यायालयात दाखल आहेत. एका विभागातून ४५ पेक्षा अधिक प्रकरणे न्यायालयात जाण्याचा हा उच्चांक आहे. याउपरही प्रशासन व अधिकारी गांभिर्याने लक्ष देण्यास तयार नाही, असा आरोप संघटनेचे सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे यांनी केला. (कार्यालय प्रतिनिधी)
आरोग्य कर्मचारी वेतनापासून वंचित
By admin | Updated: July 8, 2015 00:09 IST