पुसद : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात उभारण्यात आलेल्या व्यापार संकुलातील २६ गाळे नऊ वर्षापासून पडून आहे. नगरपरिषदेच्या उदासीन धोरणामुळे या गाळ्यांचा लिलावच झाला नाही. परिणामी या चौकातील अतिक्रमणाचा प्रश्न कायम आहे.पुसद नगरपरिषदेने एकात्मिक शहर विकास योजनेंतर्गत शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ आरक्षण क्र.८ ‘अ’च्या जागेवर २०१० मध्ये दुमजली व्यापार संकुलाचे बांधकाम केले. यासाठी ६० लाख रुपये खर्च करण्यात आला. मार्च २०११ मध्ये या व्यापार संकुलातील गाळ्यांचा जाहीर लिलावाबाबत सूचना काढण्यात आली. रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यावसायिकांना (अतिक्रमीत) हे गाळे देऊन रस्ता मोकळा करणे व गाळ्याद्वारे नियमित उत्पन्न मिळविणे, असा उद्देश होता. या गाळ्यांसाठी दीड ते तीन लाख रुपये अनामत रक्कम ठेवण्यात आली, तर मासिक भाडे एक हजारापासून दोन हजारांपर्यंत होते. २०११ मध्ये नगरपरिषद प्रशासनाने मार्च व आॅक्टोबर महिन्यात दोनवेळा दुकान गाळ्यासाठी लिलाव सूचना काढली. त्यानंतर नगरसेवक व गावपुढाऱ्याकडून प्रशासनावर दबाव आणला गेला आणि हा लिलाव रद्द करण्यास भाग पाडले. त्यानंतर पाच वर्षांपासून या दुकान गाळ्याची लिलाव सूचनाच निघाली नाही आणि पालिकेनेही त्यावर तोडगा काढला नाही.पाच वर्षांपूर्वी अनामत रक्कम दीड ते तीन लाख अशी होती. मासिक भाडे एक हजार ते दोन हजार रुपये ठेवण्यात आले होते. सदर गाळे तीन वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येईल व गाळ्याच्या मासिक भाड्यात दर तीन वर्षाने नियमानुसार भाडेवाढ करण्यात येणार होती. मात्र तुटपुंजे उत्पन्न असणाऱ्या व्यावसायिकांना ही रक्कम भरणे शक्य झाले नाही. तेव्हापासून प्रश्न रेंगाळत आहे. या बाबत नगरपरिषदेच्या उपाध्यक्षांशी संपर्क साधला असता पुसद नगरपरिषदेने नऊ वर्षांपूर्वी तत्कालिन अध्यक्ष सतीश बयास यांच्या कार्यकाळात अतिक्रमित दुकानदारांना हटवून रस्ता मोकळा करणे व पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने व्यापार संकुल बांधले. तेथील व्यावसायिकांना दुकान गाळे देण्याचा निर्णय झाला होता. पण या संकुलातील दुकानगाळे हे लिलावाच्या माध्यमातून देण्याची अट असल्याने लिलावाच्या वेळी स्पर्धक अधिक येत असल्यामुळे अतिक्रमीत व्यवसायिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे लिलाव रद्द करण्यात आले. नगरपरिषद प्रशासन या व्यापार संकुलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावणार आहे. तर व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता संकुलातील गाळे आकाराने लहान आहे. हे गाळे पुढे वाढवून देणे व अनामत रक्कम कमी केली तरच आम्हाला हे घेणे शक्य होईल. सध्या असलेली आमची दुकाने सोडल्यास आमच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल, असे सांगितले. एकंदरित नगरपरिषद प्रशासनाने समन्वयाने तोडगा काढणे अपेक्षित आहे. काय निर्णय लागतो, याकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)
्रपुसदमध्ये २६ गाळे नऊ वर्षांपासून ओस पडून
By admin | Updated: July 12, 2015 02:38 IST