वणी : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने नुकताच विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णलयाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. मात्र जनतेची सतत मागणी असतानाही वणीच्या उपजिल्हा रुग्णालयाला पुन्हा एकदा हुलकावणी मिळाली. त्यामुळे तालुक्यातील जनतेचे आरोग्यच धोक्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वणीत ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करण्यात आली. ३0 खाटांचे हे रुग्णालय गेल्या कित्येक वर्षांपासून तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी वाहात आहे. दरम्यानच्या काळात तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली. तालुक्यात विविध उद्योगही आले. त्यात कोळसा खाणींची भर पडली. आजमितीस तालुक्यात किमान १३ कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाणींमधून कोळसा उत्खनन होत असल्याने त्याचे वहन करण्यासाठी तालुक्यात वाहनांचीही मोठ्या प्रमाणात भर पडली. गेल्या काही वर्षांत या तालुक्यात लोकसंख्या आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली. वाढती लोकसंख्या व वाढत्या वाहनांमुळे अपघाताच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. दररोज तालुक्यात अपघात घडत आहे. त्यात अनेकांना जायबंदी व्हावे लागत आहे. काहींना प्राणांना मुकावे लागत आहे. मात्र जखमींवर उपचारासाठी येथे पुरेशा आरोग्य सुविधाच नाही. केवळ ग्रामीण रुग्णालयावरच सर्व भार पडत आहे. तथापि केवळ ३0 खाटांचे ग्रामीण रुग्णालय रुग्णांना योग्य आणि चांगली आरोग्य सेवा देण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे रुग्णांना नाईलाजाने चंद्रपूर, नागपूरचा रस्ता धरावा लागत आहे. या सर्व बाबींमुळे येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र अद्याप हा दर्जा प्राप्त झाला नाही. आता नुकतेच आरोग्य विभागाने लगतच्या घुग्गुस येथे ग्रामीण रुग्णालय, तर गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. त्यातही वणीच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा बहाल करण्यात आला नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत् आहे. लोकप्रतिनिधी येथे उपजिल्हा रुग्णालय आणण्यास अपयशी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा न दिल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून आहे. काही महिन्यांपूर्वी या रुग्णालयाला वाढीव २0 खाटा मंजूर झाल्याची आवई उठविण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात त्या २0 खाटाही अद्याप वाढल्याच नाही. त्यामुळे केवळ ३0 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयावरच आता तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी वाहिली जाणार आहे, हे नक्की झाले आहे. लोकप्रतिनिधींचे हे अपयशच म्हटल्यास अतिशोयक्ती ठरणार नाही. (कार्यालय प्रतिनिधी)
उपजिल्हा रुग्णालयाची हुलकावणी
By admin | Updated: June 16, 2014 23:44 IST