रुपेश उत्तरवार यवतमाळवर्षातील साडेतीन मुहर्तांपैकी एक महत्वपूर्ण दिवस म्हणून गुढीपाडव्याचा दिवस मानला जातो. या दिवसावर वस्तूंची खरेदी प्रामुख्याने केली जाते. वस्तुंच्या विक्रीसाठी व्यावसायिकांनी गुढीपाडव्याची जय्यद तयारी केली आहे. मात्र खरेदी करणारा ग्राहकच बाजारात नाही. यातून उद्योग व्यवसायालाच जबर फटका बसला आहे. गुढीपाडव्याच्या पर्वावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी केली जाते. त्याअनुषंगाने यावर्षीसुद्धा जिल्ह्यातील बाजारपेठ सज्ज आहे. या बाजारपेठेवर कृषी क्षेत्रातील दुष्काळी परिस्थितीचा मोठा परिणाम यावर्षी दिसून येत आहे. ग्राहकांकडे पैसाच नसल्याने खरेदी करण्यासाठी त्यांनी हात आखडता घेतला आहे.दरवर्षीच्या अनुभवानुसार सर्वाधिक उलाढाल वाहनांच्या खरेदीत होते. यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश असतो. वाहने आवश्यक वस्तुंमध्ये गणले जातात. त्यामुळे खरेदी करणाऱ्यांची गर्दी काही प्रमाणात या ठिकाणी दिसून येते. तरीसुद्धा मागिल वर्षाच्या तुलनेत ही गर्दी १० टक्केने कमी झाल्याचे दिसून येते.दरवर्षी ६० टक्के ग्राहक दुचाकी वाहन नगदी खरेदी करत होते. ४० टक्के कर्जावर वाहन खरेदी होत होेते. यावर्षी याच्या विरूद्ध चित्र बाजारात आहे. ६५ टक्के कर्ज प्रकरणाच्या केसेस आहेत. तर ३५ टक्के नगदी वाहन खरेदी होत आहे. मात्र नगदी वाहन खरेदी करणाऱ्यांमध्ये केवळ शासकीय कर्मचाऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे. यावर्षी गुढीपाडव्यासाठी २२४ वाहनांची बुकींग झाली आहे. वेळेवर येणारे ग्राहक धरता ही खरेदी ३०० वाहनांच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. चार चाकी वाहनांच्या बाबतीत स्थिती थोडी विदारक आहे. दुष्काळी स्थिती लक्षात घेता चारचाकी वाहनाची बुकींग होण्याची संख्या घटली आहे. कुलर आणि एसीची मागणी थांबलीदरवर्षी गुढीपाडव्याच्या पर्वावर कुलर आणि एसीची मोठया प्रमाणात खरेदी होत होती. यावर्षी ही खरेदी नसल्यातच जमा आहे. बदलत्या हवामानामुळे कुलर आणि एसी खरेदी करण्याच्या स्थितीत ग्राहक दिसत नाही. त्यामुळे ह्या वस्तू साफ करून ठेवने इतकेच काम सध्या विक्रेते करीत आहेत.वर्ल्ड कप-टीव्हीचे समीकरण संपलेवर्ल्ड कप म्हटले की आतापर्यंत टीव्हीची विक्री जोरात वाढत असे. असेच समीकरण आजपर्यंत होते. मात्र यावर्षापासून हे समीकरन बदलले आहे. गुढीपाडवा, वर्ल्डकप ह्या दोन्ही जमेच्या बाजू असताना ग्राहक टिव्ही खरेदी करायला तयार नाहीत. दर घसरल्यानंतरही मागणी नाहीपूर्वी उत्सवावर मोठी आॅफर दिली जात होती. आता स्पर्धेत उतरलेल्या कंपन्यांनी आॅफर ऐवजी त्यांच्या किमती कमी केल्या आहेत. यानंतरही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक फिरकत नाही. त्यामुळे विक्रेते कमालीचे त्रस्त आहे.मोबाईलची मागणी कायमबाजारपेठेतील चढ उताराचा कुठलाही परिणाम मोबाईल विक्रेत्यांवर झाला नाही. मोबाईलची मागणी दिवसेंदिवस कायम असल्याचे चित्र बाजारात आहे. यामध्ये नवीन सुविधांच्या कमी दरातील मोबाईलची सर्वाधिक मागणी आहे. कापड खरेदीत मंदीगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लग्नाचे कापड हमखास खरेदी होतात. यावर्षी ही कापड खरेदी अद्यापही दृष्टीस पडली नाही. त्यामुळे कापड व्यावसायीक नाराज आहेत.
गुढीपाडव्यावर दुष्काळी छाया
By admin | Updated: March 21, 2015 02:16 IST