फोटो
आर्णी : वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सोमवारी शहराची पाहणी केली. यात अनेक ठिकाणी कचरा आढळून आल्याने त्यांनी संताप व्यक्त करीत सत्ताधाऱ्यांना पुन्हा निवडून देऊ नका, असे आवाहन केले.
नगर परिषदमधील सत्ताधारी कचरा खात आहेत. कचरा उचलण्यासाठी आलेला निधी फस्त करीत आहे. एकदा निवडून आल्यानंतर यांच्याकडे संपत्ती मोठ्या प्रमाणात जमा कशी होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याधिकारीसुद्धा यात वाटेकरी असल्याचा आरोप त्यांनी केला.
नगरपरिषदेमध्ये सध्या जे सत्ताधरी आहेत, त्यांना परत निवडून देऊ नका, असे उद्गार त्यांनी काढले. लोकप्रतिनिधींनी बांगड्या घालण्याची वेळ आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार सांगूनसुध्दा काहीच फरक पडत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. शहरातील अनेक भागांना त्यांनी भेट दिली. या वेळी तहसीलदार परशराम भोसले, नायब तहसीलदार यू. डी. तुंडलवार, प्रभारी मुख्याधिकारी महेश पाटील उपस्थित होते.