राजेश कुशवाह - आर्णी
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाला यशस्वी करण्यासाठी अवैध धंद्यांना प्रतिबंध घालण्यासह अनिष्ट प्रथासुद्धा बंद करणे आवश्यक आहे. ही मोहीम अधिक लोकाभिमुख करण्यासाठी तंटामुक्त समित्यांनी राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचे पारायण करणे आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी महामानवांच्या विचाराचा प्रसार करणारे कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. तंटामुक्त अभियानाला यशस्वी करण्यासाठी गावपातळीवर असलेले अवैध धंदे बंद करणे आवश्यक आहे. राजकीय समतोल साधावा म्हणून बर्याचदा अवैध धंदे करणार्यांना गावातूनच अभय दिल्या जाते. यामुळे तंटामुक्त अभियानाला काही प्रमाणात ब्रेक लागतो. कमी श्रमात जादा पैसा कमावण्याच्या मोहातून गावपातळीवरसुद्धा अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालत असतात. अवैध व्यवसायात असणार्या लोकांना तंटामुक्त समितीच्यावतीने योग्य मार्गदर्शन करून त्यांना या पासून परावृत्त करणे गरजेचे आहे. तसेच त्याला पर्याय रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून मदतही करणे आवश्यक आहे. गावकरी व महिला बचत गटांनी एकत्र आले तर यावर प्रतिबंध बसू शकतो. परिणामी व्यसनातून अनेकांना मुक्त करता येवू शकते. ग्रामीण भागात अनिष्ट चालीरिती व अंधश्रद्धेला मोठ्या प्रमाणात उधाण आलेले असते. यामुळे गावाला अधोगती प्राप्त होते. यातून मार्ग काढण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणे गरजेचे आहे. शैक्षणिकदृष्ट्या उपेक्षित असलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा मदत केली तर त्यांना योग्य दिशा मिळू शकते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेसारख्या ग्रंथातून समाजाला मार्गदर्शन केले. तंटामुक्तीची मूलतत्त्वे या ग्रंथामध्ये दडलेली आहे. ग्रामरक्षण या अध्यायामध्ये ग्रामसुधारणेचा मूलमंत्र सांगण्यात आला आहे. त्यामुळे तंटामुक्त समित्यांनी ग्रामगीतेचे पारायण केले तर ही मोहीम यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. राष्ट्रसंतांनी ग्रामस्वच्छता, साक्षरता, ग्रामरक्षण, ग्रामनिर्माण आदींसह विविध विषयावर ग्रामगीतेतून मार्गदर्शन केले आहे. सण, उत्सव एकत्र साजरे करून तंटामुक्त समाज निर्मितीची दिशा ग्रामगीतेतून देण्यात आली आहे. या सोबतच तंटामुक्त समित्यांनी सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सामाजिक दरी असते. ही दरी मिटवण्याची जबाबदारी तंटामुक्त समितीच्या पदाधिकार्यांना पेलता आली पाहिजे. त्यासाठी महामानवांनी जे विचार सांगितले त्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करणे गरजेचे आहे. यासाठी महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजनसुद्धा करता येवू शकते. गावाला सुख आणि समृद्धीच्या वळणावर नेवून ठेवण्यासाठी तंटामुक्त समित्यांनी कृतिशील होणे गरजेचे आहे. गावागावातील सुशिक्षित तरुणांवर गावाला दिशा देण्याची जबाबदारी येवून पडली आहे. तंटामुक्त ग्राम समित्यांमध्ये शिकलेल्या तरुणांचा सहभाग वाढला तर या अभियानाला निश्चितपणे गती येईल.