घाटंजी : अनुसूूचित जमातीत धनगर तथा अन्य जातींचा समावेश करू नये. तसेच खऱ्या आदिवासी समाजाच्या आरक्षणावर गदा आणू नये यासाठी आदिवासी समाजातील विविध संघटनांनी एकत्र येऊन मंगळवारी दुपारी येथील तहसील कार्यालयावर रेंगड्या मोर्चा काढला. त्यामध्ये आदिवासी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जितेंद्र मोघे, दशरथ मडावी, निरंजन मसराम, माणिक मेश्राम, मनोहर मसराम, माधुरीताई अंजीकर, किरण कुमरे, रितेश परचाके, भोनु टेकाम आदींच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात धनगर व आदिवासी समाजाचा आरक्षण व आरक्षण बाचाओ वाद चांगलाच चिघळला आहे. त्याला विरोध दर्शविण्यासाठी आणि धनगरसह अन्य जातींना अनुसूचित जातीच्या आरक्षणात सहभागी करून घेऊ नये या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील जंगल कामगार सहकारी संस्थेच्या कार्यालयाजवळून या मोर्चाला प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून वाजत-गाजत आणि शासनाविरोधात नारेबाजी करीत हा मोर्चा निघाला. पारंपरिक वेशभुषेत सहभागी झालेले आदिवासी बांधव नागरिकांचे लक्ष्य वेधून घेत होते. तहसील कार्यालयापुढे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी मान्यवरांनी भाषणातून केंद्र आणि राज्य शासनाविरोधात रोष व्यक्त केला. त्यानंतर तहसीलदारांना मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)
घाटंजी तहसीलवर धडकला रेंगड्या मोर्चा
By admin | Updated: August 13, 2014 00:00 IST