१२ शेतकऱ्यांना दिलासा : थेट बँकेच्या खात्यात निधी जमायवतमाळ : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी विदर्भात ऋणमुक्ती अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १२ शेतकऱ्यांचे साडेतीन लाख रूपयांचे कर्ज फेडण्यात आले. याकरिता आपुलकी आणि जागृती संस्थेने पुढाकार घेतला. याचे धनादेश मंगळवारी शेतकरी कुटुंबांना बहाल करण्यात आले. पुण्यातील आपुलकी आणि जागृती या स्वयंसेवी संस्थेने विदर्भातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. बिकट परिस्थिती असलेल्या अशा शेतकऱ्यांचा या संस्थेने शोध घेतला. पाच जिल्ह्यातील १२२ शेतकऱ्यांची त्यासाठी निवड करण्यात आली. या शेतकऱ्यांकडे ८६ लाख ८० हजार रूपयांचे कर्ज होते. या कर्जाची परतफेड ‘आपुलकी’ मार्फत करण्यात येणार आहे.यामध्ये यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा आणि वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात २९ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम अदा करण्यात आली. यामध्ये यवतमाळ ८, अमरावती ७, वर्धा ८, अकोला ३ आणि वाशीमच्या ४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यातील १२ शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात साडेतीन लाख रूपयांच्या कर्जाची रक्कम अदा करण्यात आली. यामध्ये भागीरथा चंद्रवंशी नागापूर ता. उमरेखड, द्रोपदा हाडे निंगनूर ता. उमरखेड, सूर्यवंशी हेमने रातचांदना ता. यवतमाळ, रामभाऊ कुमरे पिंप्री इजारा, सुजाता ढोले सायखेडा, बोरी येथील लक्ष्मीबाई माने यांचा समावेश आहे. तर वाशीम जिल्ह्यातील जांबरूनचे श्रीराम परांडे, मंगरूळपीरचे धर्माजी कांबडे यांचीही कर्जमुक्ती करण्यात आली.कर्जमाफी प्रमाणपत्रासह बँकेच्या नावाचा धनादेश शेतकऱ्यांना बहाल करण्यात आला. यावेळी आपुलकी संस्थेचे संयोजक अभिजित फाळके, जागृती संस्थेच्या संयोजिका मयुरी ढवळे, तहसीलदार सचिन शेजाळ, प्रयास संस्थेचे प्रशांत बनगीनवार, प्रगतशील शेतकरी आनंदराव सुभेदार, डॉ. प्रशांत चक्क रवार, कमल बागडी, मिलिंद फाळके, प्रकाश साबळे, संतोष अरसोड, प्रसाद नायगावकर, निखील जैत, मिथून मोंडे, गौरव नाईकर, गोपाल चव्हाण, विजय कदम आदी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
ऋणमुक्ती अभियानातून कर्जमाफी
By admin | Updated: May 18, 2016 02:44 IST