बोरी सूत गिरणी निवडणूक : काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, आगामी निवडणुकांवर दिसणार परिणाम यवतमाळ : सहकारात काहीच अस्तित्व नसलेल्या भाजपाच्या नादी लागल्याने शिवसेनेची चांगलीच नाच्चकी झाली आहे. बोरी सहकारी सूत गिरणी निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हेतर शिवसेनेच्याही सहकारातील मर्यादा उघड झाल्या आहेत. या निवडणुकीने काँग्रेसला मात्र ऊर्जितावस्था मिळवून दिली आहे. बोरी सहकारी सूत गिरणी बंद असलीतरी तेथील संचालक मंडळाच्या निवडणुकीने भविष्यातील अनेक बदलत्या राजकीय समीकरणांचे संकेत दिले आहे. ही निवडणूक आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारातील संस्था आणि विधान परिषद निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात होती. काँग्रेसच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बंद सूत गिरणीची प्रत्यक्ष निवडणूक यावेळीही टाळण्यासाठी माणिकराव ठाकरे यांनी पुढाकार घेतला. भाजपा-सेना व राष्ट्रवादीकडे त्यांनी स्वत: मैत्रीचा प्रस्ताव दिला. परंतु त्यांचा हा प्रस्ताव धुडकावून लावत भाजपा-सेना व राष्ट्रवादीने आपली अभद्र युती रिंगणात उतरविली. त्यासाठी विधान परिषदेचे गणित डोळ्यापुढे ठेऊन राष्ट्रवादीची सुरुवातीपासूनच आग्रही भूमिका पहायला मिळाली. जिल्ह्याच्या सहकारात भाजपाचे अस्तित्व नसल्यात जमा आहे. राष्ट्रवादीचे अस्तित्व काही प्रमाणात आहे, तर शिवसेनेलाही सहकारात मर्यादा आहेत. त्या तुलनेत काँग्रेसचे नेटवर्क चांगले असल्याचे यानिमीत्ताने दिसून आले. बोरी सूत गिरणीच्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक १६ जागा पटकाविल्या. तर केवळ आठ मतदारांचा मतदारसंघ असलेल्या पाच जागा भाजपा-राष्ट्रवादी व सेनेच्या पॅनलने पटकाविल्या. या निवडणुकीचा खरा फटका शिवसेनेला बसला. गतवेळी राज्यात काँग्रेसची सत्ता असताना आणि मतदारसंघात विरोधी बाकावर असूनही शिवसेनेला आयत्याच नऊ जागा सूत गिरणीत मिळाल्या होत्या. यावेळी मात्र भाजपा व राष्ट्रवादीच्या नादात लागून सेनेला त्या जागाही गमवाव्या लागल्या. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने मिळविलेला भक्कम विजय भविष्यातील बदलत्या राजकीय वाऱ्यांचे संकेत देऊ लागला आहे. बोरी सूत गिरणीच्या निवडणुकीने काँग्रेसचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच दारव्हा तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर गुलाल उधळण्याचा योग कार्यकर्त्यांसाठी जुळून आला. काँग्रेसचा हा वाढलेला आत्मविश्वास आगामी खरेदी विक्री संघ, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदा एवढेच नव्हे तर विधान परिषद निवडणुकांमध्येही बदल घडविण्यास परिणामकारक ठरू शकतो. यवतमाळात राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसच्या विरोधात तर वाशिम-कारंजाचे नेते काँग्रेसच्या सोबत असे विसंगत चित्र या निवडणुकीत पहायला मिळाले. काँग्रेसचे पराभूत दिग्गज एकत्र आल्याने पक्षाची ताकद वाढली. त्यांच्यातील हा सुसंवाद कायम राहिल्यास दिग्रस विधानसभा, यवतमाळ-वाशिम लोकसभा आणि यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत अन्य पक्षांसाठी तो धोक्याची घंटा ठरू शकतो. दारव्हा-दिग्रस-नेरमध्ये शिवसेनेला कुणी पराभूत करू शकत नाही हा आत्तापर्यतचा समज बोरी सूत गिरणी निवडणुकीने खोटा ठरविला आहे. बोरी सहकारी सूत गिरणी निवडणुकीत शिवसेनेतील छुपा अंतर्गत कलहसुद्धा तेवढाच कारणीभूत ठरल्याचे मानले जाते. कालपर्यंत भाजपा व राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसैनिकांना आता या विरोधकांच्याच खांद्यावर हात देऊन चालण्याची वेळ अभद्र युतीने आणली होती. त्यातूनही कार्यकर्त्यांमध्ये संताप पहायला मिळाला. केवळ सत्तेभोवती फिरणारा आणि उंटावर बसून शेळ्या हाकणारा म्हणून निष्ठावंत शिवसैनिकांकडूनच हिनविल्या जाणाऱ्या एका सल्लागाराविरोधात शिवसेनेच्या गोटात सर्वाधिक रोष पहायला मिळतो आहे. याच सल्लागारामुळे काँग्रेसचा बुरुज विधानसभेत पुरता ढासळला होता याचे स्मरण कार्यकर्ते करून देत आहेत. स्थानिक निवडणुका जिंकायच्या असतील तर आधी सल्लागार बदलवा, असा सामान्य शिवसैनिकांचा पक्षाच्या नेत्यासाठी मतदारसंघात ‘मेसेज’ फिरतो आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
भाजपा-राष्ट्रवादीच्या नादात सेनेची नाचक्की
By admin | Updated: March 30, 2016 02:37 IST