वणी : अमरावती विभागात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आल्याने हे प्रशासकीय मंडळच आता वादाच्या भोवर्यात सापडले आहे.अमरावती विभागात येत्या २0 जूनला शिक्षक मतदार संघाची निवडणूक होत आहे. त्यासाठी २0 मेपासून अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र जिल्हा उपनिबंधकांनी शासनाच्या २0 मे रोजीच्या पत्रान्वये २३ मे रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे. सदर प्रशासकीय मंडळातील सदस्यांची नावे आमदार वामनराव कासावार यांच्या शिफारशीने घेण्यात आली आहे. ही बाब आचारसंहितेचा भंग करणारी व बेकायदेशीर असल्याची तक्रार विठ्ठल झाडे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.नव्याने नियुक्त केलेल्या प्रशासकीय मंडळात दोन सदस्य शिक्षक असून ते शिक्षक मतदार संघाचे मतदार आहेत, हे विशेष. मंडळातील कोणत्याही व्यक्तीवर कुठलाही गुन्हा नोंद नसल्याची खात्री करून नियुक्ती करण्याचे आदेश शासनाने जिल्हा उपनिबंधकांना दिले होते. मात्र नियुक्त झालेल्या एका सदस्यावर वणी पोलीस ठाण्यात अपराध नंबर २२४/२0१३ नुसार भादंवि कलम २९४, ५0६, १४३, ३४ नुसार गुन्हा दाखल असल्याचेही झाडे यांचे म्हणणे आहे. तरीही त्यांची मंडळात नियुक्ती कशी झाली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.नव्याने नियुक्त प्रशासकीय मंडळातील काही सदस्य सहकारी संस्थेचे किंवा ग्रामपंचायतींचे सदस्यही नाही. तसेच राखीव गटातील सदस्य नियुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे नेमलेले प्रशासकीय मंडळ बेकायदेशीर असल्याचे झाडे यांनी आक्षेपात नमूद केले आहे. अडते व मापारी गटातूनही सदस्य नियुक्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी नेमलेले प्रशासकीय मंडळ बरखास्त करावे, अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा झाडे यांनी दिला आहे.प्रशासक मंडळ स्थापन होऊन आठवडा उलट नाही तोच आक्षेप दाखल झाल्याने हे प्रशासक मंडळच वादात सापडले आहे. झाडे यांच्या आक्षेपानंतर आता जिल्हा उपनिबंधक कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
आचारसंहितेत मंडळाची नियुक्ती
By admin | Updated: May 30, 2014 00:26 IST