वाशिम : मालेगाव तालुक्यातील मुंगळा परिसरातून समृद्धी महामार्ग गेला असून, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी महामार्गालगत कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. परिणामी, पावसाचे पाणी शेतात साचत असल्याने शेताला तळ्याचे स्वरुप येत आहे.
समृद्धी महामार्गाला लागून प्रकाश इंगळे यांच्यासह अन्य काही शेतकऱ्यांची जमीन आहे. प्रकाश इंगळे यांच्या शेतामध्ये संत्रा फळबाग तसेच सोयाबीनदेखील आहे. गत चार ते पाच दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. मात्र, महामार्गालगतचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था न केल्याने सोयाबीन व संत्राबागेत पाणी साचले आहे. विहिरीभोवतीसुद्धा पाणी साचल्यामुळे विहीर खचण्याची भीती इंगळे यांनी वर्तविली आहे. पावसाचे पाणी महामार्गालगतच्या शेतात साचत असल्याने मुंगळा परिसरातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावत असल्याचे दिसून येते. शेतात पाणी साचणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणी समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारांकडे वारंवार केली. मात्र, अजून याची दखल घेण्यात आली नाही, असे शेतकरी इंगळे यांनी सांगितले.
................
प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी
समृद्धी महामार्गाच्या बाजुला शेतासाठी पर्यायी रस्ता न केल्यामुळे शेतकऱ्यांवर शेतातच माल ठेवण्याची वेळ येत आहे. या शेतातही जाता येत नाही. याकडे शासन, प्रशासन व संबंधित कंत्राटदारांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.