वाशिम, मंगरुळपीर, रिसोड आणि कारंजा बसस्थानकात सद्यस्थितीत मोठी गर्दी उसळत आहे. परजिल्ह्यातून येणारे आणि परजिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सणासुदीमुळे वाढत आहे. अशातच चालक बसस्थानकाच्या आत बेशिस्तपणे गाड्या उभ्या करतात. त्यामुळे बाहेरून आत येणाऱ्या गाड्यांना जागा शिल्लक राहत नाही, तर फलाटावर बसची प्रतीक्षा करणाºया प्रवाशांची एकच धावपळ पाहायला मिळते. शिवाय वाहतुकीची कोंडी होते. स्थानकाच्या आतमध्ये कोंडी होत असल्याचे दृश्य पहायाला मिळते. याचा त्रास एसटीचे प्रवासी आणि अन्य नागरिकांनाही सहन करावा लागतो. अशा बेशिस्त चालकांना एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिस्त लावली पाहिजे.
-----------
कोट: आगारात प्रत्येक फलाटावर बसेस उभ्या असताना त्याच वेळी बाहेरून आलेली एखादी बस बसस्थानक परिसरात फलाट सोडून उभी करावी लागते. सहसा सर्व बसेस फलाटावरच उभ्या ठेवल्या जातात. तथापि, प्रवाशांना होणारा त्रास आणि संभाव्य अप्रिय घटना टाळण्यासाठी चालकांना शिस्त पाळण्याच्या सूचना पुन्हा देण्यात येतील.
-मुकुंद न्हावकर,
आगार प्रमुख, कारंजा
---------
कोट: अमरावती येथे जाण्यासाठी वाशिम बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करीत असताना आलेली बस नियोजित फलाटाऐवजी दुसऱ्याच ठिकाणी उभी करण्यात आली. त्यामुळे बस आल्याचे कळलेच नाही. ऐन बस निघायच्या वेळी कळल्यानंतर आम्हाला धावपळ करून बसमध्ये चढावे लागले, हा प्रकार प्रवाशांना मनस्ताप देणारा आहे.
- रुपेश पाटील,
प्रवासी,
--------------
कोट: वृद्ध आईला वाशिम येथे घेऊन जाण्यासाठी कारंजा बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करीत होतो. काही वेळाने बस आली; परंतु ती दुसऱ्याच ठिकाणी उभी राहिली. बसस्थानकातून लाऊड स्पीकरद्वारे माहिती मिळाल्यानंतर आईला त्या बसपर्यंत घेऊन जाताना मोठी कसरत करावी लागली. चालक आणि आगार व्यवस्थापकांनी याची दखल घ्यावी.
-प्रकाश भंडारे,
प्रवासी.