कामरगाव परिसरातील जवळपास ४० खेड्यातील वीजग्राहकांची विजेची समस्या सोडविण्यासाठी कामरगाव येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्र आहे, परंतु या ना त्या कारणाने कामरगाव परिसरात विजेची समस्या निर्माण होणे ही नित्याची बाब झाली आहे. अशातच २२ सप्टेंबर रोजी कामरगाव परिसरात संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. कामरगाव परिसरातील विजेची समस्या सोडविण्यासाठी आतापर्यंत अनेकदा वरिष्ठांना तसेच लोकप्रतिनिधींना निवेदनाच्या माध्यमातून साकडे घालण्यात आले, परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. त्यामुळे कामरगाववासीयांनी १२ तास वीजपुरवठा बंद ठेवणारे कामरगाव येथील कनिष्ठ अभियंता इंगळे यांच्याशी गांधीगिरी करीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आता या गांधीगिरीनंतर तरी महावितरणला कामरगाव परिसरातील वीजसमस्या सोडविण्याची जाग येते का याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.
बारा तास वीजपुरवठा खंडित, ग्रामस्थांकडून अभियंत्याचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST