वाशिम : जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली जाणार आहे. याअंतर्गत प्रत्येक कुटुंबास नळजोडणी दिली जाणार असून, त्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असलेले बळकट स्रोत शोधले जात आहेत. मात्र पावसाचा अडथळा आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे या प्रक्रियेतच अधिक वेळ जात असून, कामे प्रलंबित राहत आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी जलजीवन मिशनच्या माध्यमातून पूर्ण करावी, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुषंगाने ही कामे पूर्ण करण्यासाठी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळवून घ्यावी. पंचायत समितीनिहाय कामांचा वेळोवेळी आढावा संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी घ्यावा. डिसेंबर २०२१ अखेर बहुतांश योजनांची कामे पूर्ण होतील, या दृष्टीने नियोजन करावे. जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत असल्याने ग्रामीण भागातील शाळा व अंगणवाड्यांना शुद्ध, स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे. जलजीवन मिशनअंतर्गत ‘रेट्रो फिटिंग’ची कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
प्रत्यक्षात मात्र जलजीवन मिशनअंतर्गत केली जाणारी कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून, बळकट जलस्रोत शोधण्याच्या प्रक्रियेतच प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा अधिक वेळ खर्च होत आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात पावसाने थैमान घातल्याने कामे प्रलंबित राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...............
जिल्ह्यात २१४ गाव कृती आराखडे
जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात २१४ गाव कृती आराखडे तयार करण्यात आले आहेत. चालूवर्षी प्राप्त ५ कोटींच्या निधीतून प्रगतिपथावरील २३ योजनांवर २ कोटी १५ लाख रुपये खर्च करण्यात आले. २८५ गावांमध्ये रेट्रो फिटिंगच्या माध्यमातून नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे; मात्र या कामांची गती अत्यंत संथ असल्याने कामे पूर्ण कधी होतील, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.