वाशिम : सामाजिक समतेसाठी समाजातील प्रत्येक घटकाची प्रगती होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपली वैयक्तिक प्रगती साधताना इतरांनाही बरोबर घेऊन जाण्याची व एकजुटीने प्रयत्न करण्याची मानसिकता ठेवणे आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि सहायक संचालक कार्यालय, समाज कल्याण, वाशिम यांच्या विद्यमाने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या समारोपप्रसंगी यावेळी डॉ. रवी जाधव, साहित्यिक प्रा. धोंडुजा इंगोले, समाजभूषण पुरस्कार विजेते शिवमंगल राऊत, धेंडुळे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार विजेते चंद्रकांत पवूळकर, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त एम. जी. वाठ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ए. एम. यावलीकर आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कुलकर्णी पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध थोर महापुरुषांनी समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण विचारांची मांडणी केली आहे. त्यांचे हे विचार आत्मसात करण्यासाठी प्रत्येकाने उत्साह दाखवला पाहिजे. या महापुरुषांनी लोकांच्या मनात सामाजिक जाणीव जागृत करण्याचे काम केले आहे. या सामाजिक जाणिवांचा वटवृक्ष व्हावा, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, असेही जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.
सामाजिक समतेसाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज
By admin | Updated: April 15, 2015 01:10 IST