मानोरा शहरातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या विद्यालयाकडे जाणाऱ्या एकमेव रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावर सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. मानोरा नगरपंचायतने या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिले असून, काही रस्त्यांचे काम करून मजबुतीकरण करण्यात आले, तर काही अंतरातील रस्त्याचे काम अपूर्ण आहे. प्रामुख्याने राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या विद्यालयास जोडणारा रस्ताच कच्चा आहे. आता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू असून, या रस्त्याने दहावी, बारावीच्या विद्यार्थिनींची ये-जा सुरू आहे. त्यात सततच्या पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचून दलदलीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यात शाळेत पोहोचण्यासाठी दुसरा कोणताच रस्ता नसल्याने विद्यार्थिनींना याच रस्त्यावरून चिखलात पाय रुतवत आणि स्वत:ला सावरत ये-जा करावी लागते. या प्रकारात अपघाताची भीती तसेच आरोग्यालाही धोका आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी विद्यार्थिनी, पालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
०००००००
घसरून पडल्याने विद्यार्थिनी जखमी
दिग्रस रोडवरील रणजित जाधव यांच्या घरापासून पुढे इंदिरा गांधी कन्या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने या चिखलातून स्वत:ला सावरत विद्यार्थिनींना वाट काढावी लागते. या प्रयत्नातच एक विद्यार्थिनी शनिवारी या ठिकाणी घसरून पडल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाल्याची घटनाही घडली. यामुळे पालकांत रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
००००००००००००००००००००००००
कोट : विद्यार्थिनींना शाळेत जाण्या-येण्यासाठी असलेला एकमेव रस्ता सततच्या पावसामुळे चिखलमय होत आहे. या चिखलातून वाट काढताना एक विद्यार्थिनी शनिवारी पडल्याने तिचे डोके फुटले. या घटनेनंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. आता त्वरित रस्त्याचे काम केले नाही, तर विद्यार्थिनी, पालकांना सोबत घेऊन आंदोलन केले जाईल.- प्रा. संकेत रोठे,
इंदरा गांधी कन्या विद्यालय, मानोरा