पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सचिवांनी संचालकांकडून झालेल्या कथित गैरव्यवहाराचा विस्तृत उल्लेख केला आहे. रिसोड बाजार समितीवर प्रशासक असतानाही माजी सभापती व काही संचालकांनी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलातील असलेले सहाय्यक निबंधक कार्यालयच चक्क विकून टाकले. या घटनेमुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली. या घटनेने संबंधित पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठल्याचे अधोरेखित झाले आहे. या गैरप्रकाराची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा होत आहे. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी संबंधित कर्मचारी, माजी सभापती व संचालकांवर भारतीय दंड अधिनियम १८६० नुसार विविध प्रकारचे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश २० ऑगस्ट रोजीच दिले होते. त्या अनुषंगाने सचिव विजय देशमुख यांनी पोलीस ठाण्याला तीन वेळा तक्रार देऊनही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)
बाजार समितीच्या संचालकांविरोधात सचिवाची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:49 IST