स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकावा, तसेच दहावी व बारावीनंतरच्या करिअरबाबत त्याला इत्यंभूत माहिती मिळावी, अभ्यास करण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी याअनुषंगाने समाजकल्याण विभागाच्या निधीचा उपयोग करून ग्रामीण भागात ग्रामपंचायतींनी आणि शहरी भागात नगरपालिका व नगरपंचायतींनी अभ्यासिका तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी १५ ऑगस्ट रोजी व्यक्त केली होती. त्याअनुषंगाने चाचपणी केली जात आहे. ग्रामीण भागातील मागास आणि आदिवासी वस्त्यांमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे अभ्यास करण्यासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी अभ्यासिका आणि या अभ्यासिकेत बसण्यासाठी बेंच, वीज व पंख्यांच्या व्यवस्थेसाठी समाजकल्याण विभागाच्या निधीचा उपयोग करता येईल का? या अनुषंगानेदेखील विचार केला जात आहे. मात्र, कोरोनाकाळात अगोदरच विविध योजनांसाठी निधी देताना शासनाकडून हात आखडता घेतला जात असल्याने अभ्यासिकेसाठी खरोखरच निधी मिळेल का? असा प्रश्नही विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
०००
...तर विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार!
ग्रामीण भागातील मागास आणि आदिवासी वस्त्यांमधील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी फारशा सुविधा उपलब्ध नाहीत. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अभ्यासिकेची नितांत आवश्यकता आहे. समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांमधून प्राप्त निधीतून अभ्यासिका तयार केल्या, तर खऱ्याअर्थाने विद्यार्थ्यांची सोय होणार आहे, असा सूर ग्रामीण भागातून उमटत आहे.